शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबियासहित खासगी विमानाने मुंबईहून अयोध्येला रवाना झाले आहेत. दुपारी २ वाजता ते अयोध्येत पोहोचतील. त्यानंतर ते लक्ष्मण किल्ल्यावर जाऊन साधू, संत आणि महंताची भेट घेणार असून त्यांच्याशी जनसंवाद करणार आहेत. हा जनसंवाद करताना उद्धव ठाकरे भाषण देणार असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांकडून मिळाली आहे. शिवसेनेच्या जाहीर सभेला उत्तर प्रदेश सरकारने सुप्रीम कोर्टाचा हवाला देऊन परवानगी नाकारली होती. मात्र सभा नसली तरी उद्धव ठाकरे जनसंवादच्या माध्यमातून भाषण करणार आहेत.
नसंवाद साधल्यानंतर उद्धव ठाकरे शरयू नदीच्या घाटावर पोहोचतील. संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शरयू मातेचा आशीर्वाद घेऊन महाआरतीला उपस्थित राहतील. त्यानंतर उद्या अयोध्येतील राम मंदिराचे दर्शन घेऊन पत्रकार परिषदेला संबोधित करणार असल्याचे वेळेपत्रक शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले आहे.
तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला अयोध्येतील नागरिकांनी संमिश्र प्रतिसाद दिलेला आहे. काहींच्या मते उद्धव ठाकरे यांची कृती राजकारणासाठी आहे, अशी टीका करण्यात आली आहे. तर काहींनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शवला असून तेच राम मंदिर उभारू शकतात, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.