चीन गलवान खोर्‍यात बंकर बांधतोय

चीन गलवान खोर्‍यात बंकर बांधतोय

गेल्या आठवड्यात भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झटापट झालेल्या गलवान खोर्‍याच्या ठिकाणी सध्या बंकर तयार करण्याचे काम सुरू असल्याचे उपग्रहातून टिपलेल्या छायाचित्रांमधून दिसत आले आहे. या भागात लहान लहान भिंती तयार करण्यात आल्या असून खोदकामही करण्यात आले आहे. त्यामुळे चीनचा नेमका मानस काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या आठवड्यात लडाखमधील गलवान खोर्‍यात भारत आणि चीनच्या सैन्याची झटापट झाली. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनचे ३५ ते ४० जवान मारले गेले. मात्र चीनने मृत्यूमुखी पडलेल्या जवानांचा नेमका आकडा जाहीर केलेला नाही. यानंतर परवा (२२ जून) भारत आणि चीनच्या कमांडर दर्जाच्या अधिकार्‍यांची चर्चा झाली. त्यानंतर चीनने सैन्य माघारी घेण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे सीमेवरील तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र प्रत्यक्षात चीनच्या वेगळ्याच हालचाली सुरू आहेत.

उपग्रहांनी टिपलेल्या छायाचित्रांमधून चीनचा कावेबाजपणा उघड झाला आहे. गलवान खोर्‍यात सुरू असलेल्या हालचाली उपग्रहांनी टिपल्या आहेत. त्यामधून चीनच्या मनात नेमके काय सुरू आहे याचा अंदाज येऊ लागला आहे. ओपन सोर्स इंटेलिजन्स ऍनालिस्ट डेट्रेस्फाने गलवान खोर्‍यातील काही छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. भारतासोबत संवाद सुरू ठेवून गलवानमध्ये आपली स्थिती मजबूत करण्याचे प्रयत्न चीनकडून सुरू आहेत. डेट्रेस्फाने दिलेल्या माहितीनुसार चिनी सैन्याने पँगाँग तलाव परिसरातही तळ ठोकला आहे. या भागातील चिनी सैन्याची संख्या वाढत जात आहे. पँगाँगच्या दक्षिणेला १९ किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात चिनी सैन्य उपस्थित आहे. भारतासोबत निर्माण झालेला सीमावाद चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यात येईल, अशी भूमिका चीनने जाहीर केली आहे. परवा झालेल्या कमांडर दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बैठकीतही चीनने याचाच पुनरुच्चार केला. त्यांनी पूर्व लडाखमधील सैन्य मागे घेण्याचीही तयारी दर्शवली. ५ मेपासून भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. हा तणाव कमी करण्यासाठी ५ जूनला दोन्ही देशांच्या लष्कराच्या कमांडर दर्जाच्या अधिकार्‍यांमध्ये पहिल्यांदा बैठक झाली. या बैठकीतही चीनने पूर्व लडाखमधील सैन्य मागे घेण्याची तयारी असल्याचे म्हटले होते. मात्र बैठकीतल्या निर्णयांची अंमलबजावणी होते की नाही, ते पाहण्यासाठी गेलेल्या भारतीय जवानांवर चिनी सैन्याने हल्ला केला. त्याला भारतीय जवानांनीदेखील जोरदार प्रत्युत्तर दिले. या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनचेही मोठे नुकसान झाले. मात्र चीनने मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांचा आकडा जाहीर केलेला नाही.

First Published on: June 24, 2020 3:53 PM
Exit mobile version