काँग्रेसच्या चुका सुधारण्याचे काम करतोय -पंतप्रधान

काँग्रेसच्या चुका सुधारण्याचे  काम करतोय -पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी

सध्या गाजत असलेल्या करतारपूर गुरुद्वाराच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. फाळणीच्या वेळी काँग्रेसच्या नेत्यांनी समजुतदारपणा, संवेदनशिलता आणि गांभीर्य दाखवले असते तर करतारपूर भारतापासून वेगळे होऊन पाकिस्तानमध्ये गेले नसते. काँग्रेसच्या चुका सुधारण्याचे मी काम करतोय, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

राजस्थानमधील हनुमानगड येथे प्रचारसभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी करतारपूर गुरुद्वावारावरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांना प्रथमच उत्तर दिले. यावेळी करतारपूर पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी काँग्रेसच कारणीभूत असल्याचा आरोप मोदींनी केला. फाळणीच्या वेळी काँग्रेसच्या नेत्यांना भारताच्या इतिहासात गुरुनानक देव यांचे स्थान काय होते याबाबत थोडीफार समजूत, संवेदनशीलता आणि गांभीर्य असते तर सरहद्दीपासून तीन किमी अंतरावर असलेले करतारपूर भारतापासून वेगळे झाले नसते,असा आरोप मोदींनी केला.

भाजपा सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पाकिस्तान दौर्‍यामुळे करतारपूर कॉरिडोरवरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. एकीकडे पाकिस्तानबाबत मवाळ भूमिका घेतल्याने भाजपाकडून सिद्धूवर टीका होत आहे. तर सिद्धू यांनी थेट मोदींनाच टीकेचे लक्ष्य केले आहे.

First Published on: December 5, 2018 5:15 AM
Exit mobile version