आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आता सक्रिय झाले आहेत. या स्पर्धेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही पिछाडीवर नाहीत. गेल्या काही दिवसांत राहुल गांधी प्रचार कार्यामध्ये विशेष सक्रिय झाले आहेत. ते नेहमीच वेगवेगळ्या माध्यमांमधून जनतेशी संवाद साधत असतात. मध्यंतरी त्यांनी काही विद्यार्थ्यांसोबत जेवणाचा आस्वादही घेतला होता. त्या प्रसंगाचा एक व्हिडिओ शेअर करत, ‘मला विद्यार्थ्यांकडू खूप काही शिकायला मिळालं. आमच्यामध्ये विचारांची देवाण-घेवाण झाली. शिक्षण व्यवस्थेसह अन्य अनेक मुद्यांवर मी विद्यार्थ्यांची मतं जाणून घेतली. तसंच या भेटीतून मी खूप काही शिकलो…’ अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती. दरम्यान सर्व वयोगटातीस आणि सर्व स्तरातील लोकांशी अशाचप्रकारे जोडलेलं राहण्यासाठी राहुल गांधींनी एक खास उपक्रम सुरु केला असल्याचं सांगण्यात येत आहे.
उपलब्ध माहितीनुसार, राहुल यांच्या काँग्रेस पक्षाने ‘अपनी बात राहुल के साथ’ हा विशेष उपक्रम सुरु केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाला टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडून हा उपक्रम सुरु करण्यात आल्याचं समजतंय.
I met a group of really interesting students from all over India, for dinner a few days ago. I learnt a lot from the wonderful exchange of ideas & perspectives. Here’s a short video with the highlights of our interaction.#ApniBaatRahulKeSaath pic.twitter.com/H9pW3t1ur1
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 5, 2019
प्रचाराचा नवा फंडा
राहुल गांधी ‘अपनी बात राहुल के साथ’च्या पहिल्या भागात ‘ मी राहुल गांधी काँग्रेसचा अध्यक्ष आहे,’ असं म्हणत विद्यार्थ्यांना स्वत:ची ओळख करुन देताना दिसतात. दिल्लीतील एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली. ‘युवकांचे विचार काय आहेत हे समजून घेण्यासाठी मी युवकांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे’, असं राहुल यांनी या व्हिडिओत म्हटलं आहे. काही माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, काँग्रेस नेत्यांनी सुरुवातीला या विद्यार्था्यांना केवळ एक काँग्रेस नता तुमच्याशी बोलणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे ज्यावेळी थेट पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी त्यांच्यासमोर आले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
दरम्यान, या व्हिडिओचा संबंध राजकीय क्षेत्रातील काही जाणकारांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीशी जोडला आहे. २०१४ च्या निवडणुकांपूर्वी प्रचारादरम्यान मोदी सरकारने राबवलेला ‘चाय पे चर्चा’ हा उपक्रम खूपच लोकप्रिय झाला होता. त्यामुळे याच धर्तीवर काँग्रेस पक्षाने ‘अपनी बात राहुल के साथ’ हा उपक्रम राबवू पाहत असल्याचं मत काही जाणकारांनी व्यक्त केलं आहे.