मोठी बातमी! १ सप्टेंबरपासून शाळा सुरू, केंद्र सरकार निर्णयाच्या तयारीत!

मोठी बातमी! १ सप्टेंबरपासून शाळा सुरू, केंद्र सरकार निर्णयाच्या तयारीत!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा आणि शैक्षणिक संस्था पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेत आहे. १ सप्टेंबर ते १४ सप्टेंबरदरम्यान टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा केंद्राचा विचार आहे. ३१ ऑगस्टला लॉकडाऊन संपल्यानंतर केंद्र सरकारकडून निर्बंध शिथील करत नव्या गाइडलाइन्स प्रसिध्द केल्या जातील. त्यावेळी ही घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक टाइम्सने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर केंद्र सरकारकडून लॉकडाउनची घोषणा कऱण्यात आली परिणामी शाळाही बंद झाल्या. २३ मार्चपासून संपूर्ण देशभरातील शाळा व शैक्षणिक संस्था बंद आहेत. तेव्हापासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडलेल्या बैठकीत शाळा सुरु करण्याच्या योजनेवर चर्चा झाली. मात्र असं असलं तरी विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत कसं आणि कधी आणायचं हा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकार यांच्याकडे असणार आहे.

अशी आहे केंद्र सरकारची योजना

शाळांना शाळा आणि वर्ग सॅनिटाइज करणं अनिवार्य असणार आहे. पहिल्या १५ दिवसांमध्ये १० ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यास सांगितलं जाऊ शकतं. त्यानंतर सहावी ते नववीचे वर्ग सुरु केले जाऊ शकतात. एका इयत्तेतील सर्व तुकड्यांना एकाच दिवशी शाळेत बोलावलं जाणार नाही. प्रत्येक तुकडीला दिवस ठरवून दिला जाईल. शाळांना दोन शिफ्टमध्ये काम करण्यास सांगितलं जाऊ शकतं. ही वेळा सकाळी ८ ते ११ आणि १२ ते ३ अशी असू शकते.  प्राथमिक आणि पूर्व-प्राथमिक विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्याबद्दल कोणतीही योजना नाही.

स्वित्झर्लंड मॉडेल

केंद्र सरकारने शाळा पुन्हा सुरु करण्यासाठी स्वित्झर्लंड मॉडेलचा अभ्यास केला आहे. “आम्ही स्वित्झर्लंडसारखे देश ज्यांनी मुलांना सुरक्षितपणे शाळेत आणलं आहे त्यांचा अभ्यास केला. तसंच मॉडेल भारतातही लागू केलं जाईल,” असं बैठकीत सहभागी एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे.


हे ही वाचा – बेरूतमध्ये झालेल्या भीषण स्फोटोमुळे नागरिकांचा राग अनावर!


First Published on: August 7, 2020 5:45 PM
Exit mobile version