आर्थिक मंदीचे मुंबई आणि महाराष्ट्राला परिणाम भाोगावे लागत आहेत. मागच्या पाच वर्षात महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती खुंटलेली आहे. तरिही भाजपचे नेतृत्व विरोधकांवरच सतत खापर फोडताना दिसत आहे. आमच्यावर टीका केल्याने अर्थव्यवस्था सुधारणार नाही, त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील, अशी टीका देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी आज मुंबई येथील पत्रकार परिषदेत केली.
डॉ. मनमोहन सिंह यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
– भाजपचे केंद्र आणि राज्य सरकार महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षा पुर्ण करु शकलेले नाहीत.
– भाजप सतत विरोधकांवर टीका करत आहे. मात्र त्यातून अर्थव्यवस्था मजबूत होणार नाही किंवा बँकाची स्थिती सुधारणार नाही.
– वांद्रे – वरळी सी लिंक हे काँग्रेसने केलेल्या चांगल्या कामाचे प्रतिक आहे.
– काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीपथावर होता, यात शंका नाही.
– आमच्या काळात काही चुका झाल्या असतील पण या सरकारने आमच्या चुकांपासून शिकून नवे धोरण आखायला पाहीजे होते.
– जर २०२४ पर्यंत ५ ट्रिलीयन इकॉनॉमी करायची असेल तर विकासदर १० ते १२ टक्क्यापर्यंत वाढायला हवा. कारण २०१८ मध्ये २.७ ट्रिलीयनची इकॉनॉमी होती.
– नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेला काही फायदा झाला असे मला वाटत नाही. IMF ने ही नुकतच वक्तव्य केलं होतं की नोटाबंदीमुळे फायद्यापेक्षा नुकसान झाले.
– कलम ३७० हटविण्याचे बिल जेव्हा संसदेत आले तेव्हा काँग्रेस पक्षाने त्याच्या बाजूने मतदान केलेले आहे, विरोधात नाही.
– इंदिरा गांधी यांनी सावरकर यांचे पोस्टल स्टॅम्प आणले होते. आम्ही सावरकरांच्या विरोधात नाहीत. मात्र त्यांच्या हिदुंत्ववादी विचारांचा आम्ही विरोध करतो..
– ईडीचा वापर राजकीय सूड उगविण्यासाठी नाही झाला पाहीजे.
– स्वातंत्र्याच्या लढ्यात काँग्रेसचे काय योगदान होते, ते संपुर्ण देशाला माहीत आहे. स्वातंत्र्यलढ्यात भाजप-संघाचे कुठेही योगदान नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये.
– जर आम्ही बँकेची बॅलन्सशीट खराब केली असेल, तर तुम्ही ती सुधारण्यासाठी काय प्रयत्न केले. युपीएवर टीका करुन परिस्थिती सुधारणार नाही.
या पत्रकार परिषदेत पीएमसी बँकेच्या खातेदाराने देखील आपली व्यथा मांडली. यावर उत्तर देताना मनमोहन सिंह म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून १६ लाख खातेदारांना न्याय दिला पाहीजे.