करोना २५ जुलै रोजी भारत सोडून जाईल

करोना २५ जुलै रोजी भारत सोडून जाईल

जगभरात करोनाचे थैमान वाढत असताना या जीवघेण्या संसर्गजन्य आजारापुढे सगळेच हतबल झाले आहेत. एकीकडे करोनावर लस आणि औषधे शोधण्यासाठी दिवसरात्र शास्त्रज्ञ मेहनत करत आहेत, अशा परिस्थितीत करोना २५ जुलै रोजी भारत सोडून जाईल, असे सिंगापूरच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

सिंगापूर यूनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी अ‍ॅण्ड डिजाइनच्या (SUTD) शास्त्रज्ञांनी आपल्या एका अभ्यासात काही तारखा जाहीर केल्या असून ३० सप्टेंबरपर्यंत ब्रिटनमधून कोरोनाचा सर्वनाश होईल, असे त्यांनी सांगितले आहे. शास्त्रज्ञांनी ७ मे रोजी या तारखांबाबत माहिती दिली असून पुढील ४ महिन्यात ब्रिटनमधून करोनाचा सर्वनाश होऊ शकतो, असेही सांगितले आहे.

सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड डिझाईनने दिलेल्या अहवालानुसार, करोनाचा फैलाव २५ जुलै रोजी भारत सोडून जाईल. अशाप्रकारे, विद्यापीठाने जगातील विविध देशांमधील कोरोना संकटाच्या समाप्तीची तारीख दिली असून विद्यापीठाचा अंदाज आहे की, या जीवघेण्या करोनाचे जीवन चक्र बर्‍याच देशांमध्ये अंतिम टप्प्यात आहे. तसेच, ८ मे रोजी इतर काही देशांबाबत शास्त्रज्ञांनी अंदाज वर्तवला. यानुसार २४ऑक्टोबरपर्यंत इटलीमध्ये करोनाचा पूर्णपणे विनाश होईल, असा शास्त्रज्ञांनी अंदाज वर्तवला आहे. तर, ११ नोव्हेंबरपर्यंत अमेरिकेत व्हायरसचा अंत होईल आणि त्याचप्रमाणे सिंगापूरमध्ये २७ ऑक्टोबरपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव नाहिसा होईल, असे सांगण्यात येत आहे.

द सनच्या वृत्तानुसार, सेंटर फॉर एविडेंस बेस्ड मेडिसीनच्या प्राध्यापकाने असे म्हटले की, जर संक्रमण आणि मृत्यूचा हा दर कायम राहिला तर जून अखेरीस या आजारामुळे मृतांची संख्या कमी होईल.

First Published on: May 25, 2020 5:04 AM
Exit mobile version