पत्नीला सोडनं ३३ NRI अर्थात अनिवासी भारतीयांना चांगलंच महागात पडलं आहे. पत्नीला सोडल्यानं भारतीय सरकारनं त्यांच्यावर कारवाईचा बडगा उभारला आहे. या अनिवासी भारतीयांविरोधात कठोर पावलं उचलत त्यांचे पासपोर्ट रद्द करण्यात आले आहेत. केंद्रीय महिला आणि बालकल्याण विकास मंत्रालयानं याबाबतची माहिती दिली आहे. शिवाय, पत्नीला सोडणाऱ्या या ३३ अनिवासी भारतीयांना फरार म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात आता लूक आऊट नोटीस बजावण्यात आली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या ३३ अनिवासी भारतीयांविरोधात ही कारवाई केली आहे. या अनिवासी भारतीयांबद्दलची सर्व माहिती गोळा करण्यात आली असून ती मंत्रिमंडळासमोर सादर देखील करण्यात आली आहे.
अनिवासी भारतीयांसोबत लग्न केलेल्या महिलांच्या सुरक्षेसाठी आता राष्ट्रीय महिला आयोगानं देखील कडक पावलं उचलायला सुरूवात केली आहे. तसेच तक्रारींसाठी nricell-ncw@nic.in हा मेल आयडी देखील जारी करण्यात आला आहे. भारतीय अनिवासांशी केलेलं लग्न सध्या मोठी समस्या म्हणून देखील समोर येताना दिसत आहे. त्याविरोधात, महिलांच्या सुरक्षेसाठी देखील सरकारनं कडक पावलं उचलायला सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ३३ अनिवासी भारतीयांचे पासपोर्ट रद्द करण्यात आले आहेत.