‘अमर जवान स्तंभा’कडे प्रशासनाचे दुर्लक्ष

‘अमर जवान स्तंभा’कडे प्रशासनाचे दुर्लक्ष

अमर जवान स्तंभ

दहशतवादी हल्ल्यांमध्ये सीमेवरील चकमकेत जवान शहीद होत असतात आणि त्यांचे स्मारक, स्तंभ त्यांच्या मुळगावी, सरकारी कार्यालयासमोर, चौकात उभारलेले दिसतात. ते स्मारक, स्तंभ हे त्या शहीद जवानांना एक प्रकारची मानवंदनाच असते. पण जे स्तंभ किंवा स्मारक उभारले जातात त्याच्या उभारणीनंतर त्याची देखभाल केली जाते का? हा मोठा प्रश्न उभा राहतो. अशीच एक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. उल्हासनगरमधील प्रभाग समिती कार्यालयासमोर असलेल्या अमर जवान स्तंभ हा मोडकळीस आला आहे. महानगरपालिका आणि राजकीय नेत्यांना त्याची डागडुजी करण्यास वेळ नसल्याच दिसत आहे. १४ फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अमर जवान स्तंभाची आठवण होते. मात्र, या स्तंभाची अवमानकारक परिस्थितीकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे दिसत आहे.

स्तंभाची बिकट अवस्था

व्हीटीसी मैदानासमोर अमर जवान चौक असून या चौकामध्ये अमर जवान स्तंभ उभारण्यात आला आहे. २००४ मध्ये संग्राम फाउंडेशन आणि महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने कारगिल विजय दिवसाच्या स्मरणार्थ या स्तंभाची उभारणी करण्यात आली आहे. या स्तंभासाठी खास राजस्थानमधून बंदूकची प्रतिकृती मागवण्यात आली होती. मात्र, सध्याच्या परिस्थितीत त्या विजय स्तंभाची अवस्था बिकट आहे. स्तंभाजवळील बंदूक तुटलेली आहे. तेथील प्रकाश योजना बंद पडली आहे. गढूळ पाणी स्तंभाच्या आजूबाजूला साचलेले यातून लक्षात येत की प्रशासनाच याकडे दुर्लक्ष झाल्याच स्पष्ट होत आहे.

तक्रारीची दखल घेतली नाही

अमर जवान स्तंभाच्या दुरवस्थेबाबत आम्ही प्रभाग समिती- ३ चे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी आणि अन्य अधिकाऱ्यांना तक्रारी केलेल्या आहेत. मात्र त्याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. अशा प्रकारे शहीद स्मारकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. त्याचप्रमाणे राजकीय नेते देखील या प्रकरणी तेवढेच जबाबदार आहेत, असे संग्राम फाउंडेशनचे पदाधिकारी काका भोसले यांनी सांगितले.

First Published on: February 18, 2019 9:52 PM
Exit mobile version