Hathras Case : पोलिसांच्या कारवाईवर हायकोर्टाचे ताशेरे; २ नोव्हेंबरला होणार पुढील सुनावणी

Hathras Case : पोलिसांच्या कारवाईवर हायकोर्टाचे ताशेरे; २ नोव्हेंबरला होणार पुढील सुनावणी

हाथरसमध्ये कलम १४४ लावल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठात आज, सोमवारी सुनावणी पार पडली. दोन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर पीडितेच्या कुटुंबाने आपली बाजू मांडली. तसेच सरकारच्या वतीने अनेक अधिकारी कोर्टात हजर होते. या प्रकरणी सुनावणी पार पडली असून पुढील सुनावणी २ नोव्हेंबरला ठेवण्यात आली आहे. या प्रकरणी परशुराम सेनानेही सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईवर हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. पीडितेच्या कुटुंबानेही कोर्टात सांगितले की, त्यांच्या संमतीविना अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबातील सदस्यांना आणखी चौकशीत अडकविण्याची भीती होती आणि त्यांनी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. पुढील सुनावणीत पीडितेच्या कुटुंबाच्या आरोपांवर चर्चा करण्यत येईल, असे समजते.

सुनावणी दरम्यान हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठाने अतिरिक्त मुख्य सचिव गृह, डीजीपी हितेश चंद्र अवस्थी, एडीजी कायदा व सुव्यवस्था प्रशांत कुमार यांच्यासह हाथरसचे डीएम प्रवीण कुमार आणि एसपी विक्रांत वीर यांना समन्स बजावले आहे. हाथरस घटनेत ज्या प्रकारे पोलिसांची कारवाई करण्यात आली आहे, त्यावरून हाथरस पोलीस आणि योगी सरकारला कोर्टात अनेख कठोर प्रश्नांचा सामना करावा लागणार हे स्पष्ट आहे, अशी माहिती आज तक वृत्तसंस्थेने दिली.

दरम्यान, महिलांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर सोमवारी काँग्रेसने डिजिटल मोहीम राबवली. त्याअंतर्गत राहुल गांधी यांनी आपला एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यामध्ये उत्तर प्रदेशा सरकार गुन्हेगारांना वाचवण्याचे काम करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी मी हाथरसला गेलो होतो, जाताना मला अडवण्यात आले. दुसऱ्यांदा मी गेलो. त्यावेळी मला त्या पीडित कुटुंबाला भेटण्यापासून का रोखले गेले. त्यांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला, त्यानंतर खून झाला. ज्यावेळी मी पीडित कुटुंबाशी बोललो, त्यावेळी सरकारने पीडितांवर हल्ले करण्यास सुरू केली. हाथसर घटनेत सरकारचे वागणे अमानवीय आणि अनैतिक आहे. पीडितेच्या कुटुंबाला मदत करण्याऐवजी ते गुन्हेगारांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत. चला, देशभरातील महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध आवाज उठवूया, अशी टीका राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

हेही वाचा –

TRP घोटाळ्यातील मुख्य आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

First Published on: October 12, 2020 11:48 PM
Exit mobile version