इम्रान खानने अझहरला भारताकडे सोपवावं – सुषमा स्वराज

इम्रान खानने अझहरला भारताकडे सोपवावं – सुषमा स्वराज

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज

‘पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान इतकेच उदार आहेत तर मग त्यांनी मसूद अजहरला आमच्याकडे सोपवावं’, अशी मागणी पराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केली आहे. ‘जोपर्यंत पाकिस्तान आपल्या जमिनीवर आश्रय दिलेल्या दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करत नाही, तोपर्यंत त्यांच्याशी चर्चा केली जाणार नाही’, असंही स्वराज यांनी पुन्हा एकदा खडसावून सांगितलं. ‘भारतीय जग: मोदी सरकारचं परराष्ट्र धोरण’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आम्हाला दहशतवादावर चर्चा नको तर कारवाई हवी आहे, असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. ‘भारत-पाकमधील संबंधात वारंवार अडथळा निर्माण करणाऱ्या आयएसआय आणि लष्करावर पाकिस्तानने नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे’, असंही स्वराज यावेळी म्हणाल्या.

…तर दोन्ही देशातील संबंध बिघडतील

भारताने पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्यावर पाकने दिलेल्या प्रतिक्रियेवरही  स्वराज यांनी सवाल उपस्थित केला. ‘पाकिस्तानी लष्कर जैश-ए-मोहम्मदच्या वतीने आमच्यावर हल्ला का करत आहे?’, सा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला. ‘तुम्ही जैश-ए-मोहम्मदला आपल्या जमिनीवर फक्त आश्रय देत नाही तर त्यांना पैसेही पुरवता. जेव्हा पीडित देश याचं उत्तर देतो तेव्हा तुम्ही त्यांच्या वतीने हल्ला करता’, असा थेट आरोप स्वराज यांनी लावला. ‘पाकिस्तानने जैश सारख्या दहशतवादी संघटनांना आश्रय देणं बंद न केल्यास तसंच त्यांच्यावर वेळीच कारवाई न केल्यास दोन्ही देशांमधील संबंध अधिक बिघडू शकतात’, असंही स्वराज यांनी यावेळी सुचित केलं.

First Published on: March 14, 2019 10:10 AM
Exit mobile version