…तर लॉकडाऊनचा अवधी वाढू शकतो, सरकारकडून तीन महिन्यांची तयारी

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामुळे २१ दिवस नागरिकांना घरातच बसून काढावे लागणार आहेत. पण देशात करोनारुग्णांचा वाढता आकडा पाहता सरकारने आज नागरिकांसाठी जाहीर केलेले मदतीचे पॅकेज हे तीन महिन्यांच्या कालावधीसाठी केलेले आहे.

जगात हाहाकार उडवणाऱ्या करोना व्हायरसने भारतात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. आज गुरुवारी दुपारपर्यंत देशात करोनाग्रस्तांचा आकडा ६५० वर पोहचला आहे. याचपार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. त्यानंतर देशवासियांसाठी मदतीचे पॅकेज जाहीर केले. पण लॉकडाऊन २१ दिवसांचा असतानाही पॅकेज मात्र तीन महिन्यांसाठी दिले आहे. यामुळे करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकार २१ दिवसांचा लॉकडाऊन वाढवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. यास केंद्र सरकारकडून दुजोरा मिळालेला नाही. मात्र सरकारची तयारी पाहता लॉकडाऊनचा कालावधी २१ दिवसांनंतर वाढवून एप्रिल-मे आणि जूनपर्यंत वाढवण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाची साखळी तोडण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी आवश्यक असल्याचे जनतेला संबोधताना सांगितले होते. पण २१ दिवसांचा कालावधी पुरेसा नसल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. यामुळे मोदी सरकार २१ दिवसांनंतर यावर पुनर्विचार करू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

First Published on: March 26, 2020 5:06 PM
Exit mobile version