मिशन २०२४ : निष्क्रिय खासदारांना मोदींचा सूचक इशारा; मतदारसंघात फिरा, अन्यथा…

मिशन २०२४ : निष्क्रिय खासदारांना मोदींचा सूचक इशारा; मतदारसंघात फिरा, अन्यथा…

नवी दिल्ली – मिशन २०२४ साठी (Mission 2024) भाजपाने (BJP) जोरदार तयारी केली असून आपआपल्या मतदारसंघात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर ज्या खासदारांचा अहवाल नकारात्मक आहे, अशा खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) वैयक्तिक भेट घेऊन मतदारसंघ टिकवण्यासाठी खासदारांची शाळा घेत आहेत. मतदारसंघात जास्त वेळ देऊन लोकांचं म्हणणं ऐकून घेण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित खासदारांना दिले आहेत.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीला आता काहीच महिने शिल्लक आहेत. त्यामुळे मिशन २०२४ काबीज करायचं असेल तर आतापासून भाजपाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, काही राज्य आणि त्यांच्या लोकसभा मतदारसंघातून येणाऱ्या अहवालामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी चिंतेत आहेत. संसदेत सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने या संबंधित खासदारांना बोलावून पंतप्रधानांनी त्यांना मतदारसंघ टिकवण्याचे धडे दिले आहेत.

हेही वाचा – दिल्ली दूर नहीं! देशातील सर्वांत लांब ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेचे आज उद्घाटन

केंद्रीय मंत्र्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने अशाप्रकारचे सर्वेक्षण करत असतात. त्यांना प्राप्त झालेल्या अहवालानुसार काही मंत्र्यांचे अहवाल समाधानकारक नाहीत. त्यामुळे आपल्या सरकारमधील मंत्री आणि खासदारांनी आपल्या मतदारसंघाकडे लक्ष द्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. लोकांच्या समस्या जाणून घेताना टीका झाली तरी सहन करा, पण मतदारसंघात जा, असे आदेशच मोदींनी दिले आहेत. परंतु, मतदारसंघातील लोकांच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. त्या अपेक्षा पूर्ण न झाल्यास ते नाराज होतात, अशी तक्रारही काही मंत्र्यांनी मोदींकडे केली आहे.

मतदारसंघात लोकांशी कसं बोलावं? आपल्या खात्यातील कामे कशी करून घ्यावीत याकरता माजी केंद्री मंत्री रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांच्याकडून शिकवणी घेण्याचे निर्देश उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार आणि झारखंडच्या काही खासदारांना दिले आहेत. या दोन्ही माजी मंत्र्यांकडे विविध विषयांवर बोलण्याची उत्तम कला अवगत आहे.

भाजपा खासदार जगदंबिका पाल यांचाही दाखला मोदींनी दिला आहे. वयाच्या ७३ व्या वर्षीही ते दररोज दिल्ली ते उत्तर प्रदेश असा प्रवास करत आहेत.

प्रत्येक राज्यातून भाजपाने लक्ष्य ठेवले आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. यावेळी उत्तर प्रदेशमधून भाजपाने ८० जागा जिंकण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मोदींनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, यंदा विद्यमान आमदारांचं तिकिट कापून दुसऱ्या उमेदवाराला संधी दिली जाऊ शकते.

First Published on: February 12, 2023 9:15 AM
Exit mobile version