माझी तुलना शूर्पणखाशी केली, रेणुका चौधरी यांच्या दाव्यावरून नेटिझन्स आक्रमक

माझी तुलना शूर्पणखाशी केली, रेणुका चौधरी यांच्या दाव्यावरून नेटिझन्स आक्रमक

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रावणाशी केल्यावरून भाजपा आक्रमक झाली आहे. यावरून दोन्ही पक्षांत शाब्दिक युद्ध रंगलेले असतानाच माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी या वादात उडी घेतली आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपली तुलना शूर्पणखाशी केली होती, याची आठवण त्यांनी करून दिली. त्यावरून नेटिझन्स आक्रमक होऊन त्यांनी घेरण्याचा प्रयत्न केला.

गुजरातमधील एका सभेत नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदींची तुलना रावणाशी केली. मोदी प्रत्येक निवडणुकीत दिसतात, त्यांना रावणसारखी 100 डोकी आहेत का? अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली होती. त्यावर भाजपा आक्रमक झाली आणि त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. खर्गे यांनी ही टिप्पणी केली नसून ती सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडून आली आहे. पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या पंतप्रधान मोदी यांचा काँग्रेसने अपमान केला आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी तर, संपूर्ण गुजरातचा अपमान केला आहे. त्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागायला हवी, अशी मागणी भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली.

त्यात आता काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी ट्वीट करत पंतप्रधान मोदी यांनी आपली तुलना शूर्पणखाशी केली होती याचे स्मरण करून देतानाच प्रसार माध्यमे तेव्हा कुठे होती, असा सवाल केला आहे. तथापि, या ट्वीटनंतर अनेक सोशल मीडिया युझर्स रेणुका चौधरी यांच्या समर्थनार्थ तर, काही विरोधात उतरले आहेत. काही युझर्सनी त्यांना शूर्पणखावरील पंतप्रधानांच्या वक्तव्याचा व्हिडीओ देण्यास सांगितले. तर अनेकांनी 2018 सालचा संसदेच्या अधिवेशनादरम्यानचा व्हिडीओ पोस्ट करून रेणुका चौधरी यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. आहे. त्यात पंतप्रधान मोदी म्हणतात, “अध्यक्ष महोदय, रेणुका चौधरी यांना थांबवू नका. असे हसणे ऐकण्याची संधी रामायण मालिकेनंतर मिळाली आहे.”

भाजपाकडून व्हिडीओ जारी
पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल जेव्हा-जेव्हा आक्षेपार्ह टिप्पणी केली, तेव्हा काँग्रेसचेच नुकसान झाल्याचा एक व्हिडीओ भाजपाने ट्वीट केला आहे. ‘मोदी जी को जब-जब दी गाली, हुई कांग्रेस की झोली ख़ाली…’ असे शीर्षक त्याला देण्यात आले आहे. 2007 साली गुजरातमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला, 2014च्या लोकसभा निवडमुकीत यूपीएचा पराभव, 2017मध्ये पुन्हा गुजरातमध्ये पराभव, 2019च्या लोकसभेत यूपीएचा पुन्हा पराभव आणि आता जी टिप्पणी करण्यात आली आहे, त्याला गुजरातची जनता उत्तर देईल, असे या ट्वीट मध्ये म्हटले आहे.

First Published on: November 30, 2022 12:19 PM
Exit mobile version