निसर्गाच्या सानिध्यात राहायला कुणाला नाही आवडत. पण शहरात पोटापाण्यासाठी स्थायिक झालेल्यांना कुठला आलाय निसर्ग! पण तुम्हाला एका वक्तिची ओळख करुन देणार आहोत. ज्याने आपल्या कामाच्या ठिकाणीच निसर्ग उभा केलाय. ओडिशाच्या भुवनेश्वर येथील रिक्षा चालक सुजीत दिगल हा आपल्या रिक्षातच निसर्ग घेऊन फिरतो. अर्थात हा निसर्ग जिवंत आहे. सुजीतच्या रिक्षामध्ये रोपटे, वेली, पक्षी, मासे आणि ससे आहेत. सुजीतच्या रिक्षाची हवा सध्या देशभरात झालेली आहे. मुंबईतही असे अनेक प्रयोग झाले होते. मात्र गार्डनसोबतच प्राणी घेऊन फिरणारा सुजीत हा पहिलाच रिक्षावाला आहे.
‘दिल गार्डन गार्डन हो गाय’, असा गुलशन ग्रोवरचा डायलॉग फेमस आहे. या रिक्षात बसल्यानंतर प्रवाशाला देखील दिल गार्डन गार्डन हो गयाचा फिल येतो. सुजीत दिगलची यामागची प्रेरणा देखील भन्नाट आहे. गावावरुन पोट भरण्यासाठी त्याला शहरात यावं लागलं होतं. शहरात आल्यानंतर रिक्षा चालविताना त्याला सतत गावाची आठवण यायची. म्हणून त्याने रिक्षातच आपल्या गावातला निसर्ग उभा केला. स्वतःला निसर्गाच्या सानिध्यात ठेवण्यासाठी सुजीतने निसर्ग वसवला.
Since I can't go to my village often, I thought of designing my auto in this way. The plants and birds provide a vibe of my village: Sujit Digal, an auto driver in Bhubaneswar #Odisha (12.10) https://t.co/3onei2jF8B pic.twitter.com/ZKcQ1qESyg
— ANI (@ANI) October 12, 2020
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सुजीत म्हणतो की, “मी कंधमाल जिल्ह्यातील एका गावातून शहरात आलो. पण मला शहराची हवा जमली नाही. घुसमट होते इथे. पण गावालाही जाता येत नाही, पोटापाण्याचा प्रश्न आहे. म्हणून मी निसर्गात विसावण्यासाठी रिक्षातच निसर्ग वसवला. माझ्या रिक्षात झाडाच्या कुंड्या आहेत. पशु-पक्षी आहेत. या सर्व गोष्टी मला गावाचा फिल देतात.”
सोशल मीडियावर सुजीतचे एका बाजुला कौतुक होत आहे. तर दुसऱ्या बाजुला अनेकांनी त्याला सल्ले देखील दिले आहेत. रोपटे गाडीत ठेवण्यापर्यंत ठिक आहे. पण पक्षी, मासे आणि ससा रिक्षात ठेवायला नको, असे अनेकांचे म्हणणे आहे. रिक्षा दिवसभर फिरत राहणार, इतर गाड्यांचे कर्णकर्कश आवाज, हॉर्न यामुळे हे प्राणी घाबरून जाऊ शकतात. त्यामुळे सुजीतने प्राण्यांना सुरक्षित स्थळीच ठेवावे, अशी लोकांचे म्हणणे आहे.