प्रवाशांना मिळणार फक्त Confirm Ticket, आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडून होणार जुगाड

प्रवाशांना मिळणार फक्त Confirm Ticket, आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडून होणार जुगाड

Confirm Ticket by Artificial Intelligence | नवी दिल्ली – Confirm तिकिटांसाठी प्रवाशांना आता अंतिम क्षणापर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. कारण भारतीय रेल्वेने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)च्या आधारे तिकिट कन्फर्म करण्यासाठी यंत्रणा उभारण्याकरता चाचपणी सुरू केली आहे. यामुळे, लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी जास्तीत जास्त प्रवाशांना कन्फर्म तिकिटे कशी मिळतील यासाठी रेल्वेने उपाय शोधला आहे. यामुळे वेटिंग लिस्टची यादी घटून लाखो प्रवाशांना फायदा होणार आहे. म्हणजेच, प्रवाशांना बुकिंगच्या वेळीच कन्फर्म तिकिट मिळू शकेल. कन्फर्म तिकिटासाठी प्रवाशांना प्रतिक्षा करावी लागणार नाही. यामुळे शेवटच्या क्षणी पदरात पडणारी निराशा आता दूर होणार असून प्रवाशांना कोणत्याही प्रकारच्या मनस्तापाला सामोरे जावे लागणार नाही.

तिकीट वेटिंग लिस्टमध्ये असेल तर अनेक प्रवाशांना मनस्ताप होतो. पण, भारतीय रेल्वे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या माध्यमातून या समस्येवर तोडगा काढत आहे. भारतीय रेल्वेचे हे प्रयत्न यशस्वी झाले तर लांबलचक प्रतीक्षा यादी संपुष्टात येऊन बहुतेक प्रवाशांना निश्चित तिकिटे मिळू शकतील. या एआय-आधारित प्रायोगिक तत्वाद्वारे प्रथम, 200 गाड्यांमध्ये अशा प्रकारे तिकिटे जारी करण्यात आली होती, आणि बहुतेक लोकांना फक्त कन्फर्म तिकिटे मिळाली. त्यामुळे या गाड्यांची प्रतीक्षा यादी खूपच कमी राहिली.

प्रतीक्षा यादीतील तिकिटांशी संबंधित असलेल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भारतीय रेल्वेने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वर आधारित चाचणी पूर्ण केली आहे. या चाचण्या सकारात्मक असल्याचंही सांगितलं जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून रेल्वे या प्रकल्पावर काम करत होती. या अंतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजन्सला गेल्या काही वर्षांतील तिकीट बुकिंग डेटा आणि बुकिंग ट्रेंडबद्दल सांगण्यात आले. यावेळी कोणत्या स्थानकांदरम्यान आणि कोणत्या वेळी बर्थ मिळण्याची शक्यता आहे हे शोधून काढण्यास सोपे होईल, अशी यंत्रणा निर्माण करण्याचे निर्देश दिले होते.

कशी सुरू आहे चाचणी?

हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉड्यूल रेल्वेच्या स्वतःच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट संस्थेने सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम (CRIS) द्वारे तयार केले आहे. त्याला आयडियल ट्रेन प्रोफाइल असे नाव देण्यात आले आहे. चाचणीदरम्यान या प्रणालीमध्ये आधीचा डेटा देण्यात आला होता. दिलेल्या डेटामध्ये किती लाख लोकांनी तिकीट बुक केले? कुठल्या स्टेशनपासून कुठपर्यंत बुकिंग झालं? कन्फर्म तिकीट कधी देता आले नाही? प्रवासाच्या कोणत्या भागांमध्ये सीट रिकामी होती? गेल्या तीन वर्षांचा असा डेटा आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉड्यूलमध्ये देण्यात आला होता.

प्रवाशाला जेव्हा तिकिट कन्फर्म होत नाही तेव्हा ते इतर मार्गांचा अवलंब करतात. रस्ते मार्गे किंवा हवाई मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला जातो. पंरतु, यामुळे वेळेचा किंवा पैशांचा अपव्यय होतो. त्यामुळे प्रवाशांचे अंतर आणि पैसे वाचवण्याकरता आणखी काय करता येईल यावर रेल्वे अधिकाऱ्यांकडून सातत्याने चाचपणी सुरू आहे. त्यानुसार, अधिकाधिक प्रवाशांना कन्फर्म तिकिटे बुक करता यावीत यावर चाचणी सुरू आहे.

सध्याची प्रतीक्षा यादी कशी आहे?

तिकिट बुक केल्यानंतर प्रवाशांना वेटिंगलिस्टचा क्रमांक दिला जातो. ट्रेन सुटण्याच्या २ ते ४ तास आधी अंतिम चार्ट तयार होतो. यानुसार, प्रवाशाचे तिकिट कन्फर्म झाले आहे की नाही हे कळतं. अचानक आयत्या वेळेला तिकिट कन्फर्म नाही झाल्यास प्रवाशांचा हिरमोड होतो. वेगवेगळ्या कोट्यासाठी आणि वेगवेगळ्या स्थानकांसाठी मोठ्या संख्येने बर्थ आरक्षित असल्यामुळे ही परिस्थिती उद्भवते. प्रत्यक्षात मात्र सर्व कोट्यातील जागांचा वापर झालेला नसतो. शेवटचा तक्ता आल्यावरच तिकीट कन्फर्म झाले की नाही हे कळते. लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये 60 थांबे स्थानके असल्यास, मूळ आणि अंतिम गंतव्यस्थानाच्या दरम्यान संभाव्यतः 1,800 तिकीट उर्वरित असू शकतात. जर फक्त 10 थांबे असतील तर ही संख्या 45 असू शकते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण भारतीय रेल्वेमध्ये हे संभाव्य तिकीट संयोजन सुमारे एक अब्ज आहे. कृआर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) नुसार प्रवाशांना जास्तीत जास्त कन्फर्म तिकिटे कशी आणि कोणत्या क्षेत्रात दिली जाऊ शकतील यासाठी मदत करतात.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स तिकिट बुकिंगची संपूर्ण प्रक्रिया ऑटोमेशनवर होईल. म्हणजे, कोणत्याही कोट्यातील रिक्‍त जागांचा अधिक चांगला उपयोग कसा करता येईल, हे आधीच्या मागणीच्या आधारे ठरवले जाईल. गर्दीच्या हंगामात कन्फर्म तिकिटांच्या मागणीसाठी ही योजना प्रभावी ठरू शकेल.

First Published on: January 27, 2023 11:44 AM
Exit mobile version