नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या अमेरिकेला (Rahul Gandhi in USA) गेले आहेत. तिथे एका कार्यक्रमात त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. पण यावेळी भारतातील मुस्लिमांच्या (Muslims in India) स्थितीबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी उत्तर प्रदेशचा दाखला दिला आणि आपल्या काँग्रेस पक्षालाच अडचणीत आणले.
भारतातील मुस्लिमांच्या स्थितीबाबत ‘बे एरिया मुस्लीम कम्युनिटी’ने (Bay Area Muslim community) विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले की, तुमच्यावर (मुस्लीम) ज्याप्रकारे हल्ले होत आहेत, शीख, ख्रिश्चन, दलित, आदिवासींनाही तसेच वाटत आहे, हे मी खात्रीपूर्वक सांगतो. भारतातील मुस्लिमांची स्थिती आता 80च्या दशकातील उत्तर प्रदेशातील दलितांसारखीच आहे, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, 80च्या दशकाचा उल्लेख करताना, त्यातील नऊ वर्षे तिथे काँग्रेसचीच सत्ता होती, हे राहुल गांधी यांनी लक्षात घेतले नाही. उलट हा दाखला देऊन त्यांनी आपल्याच पक्षाला अडचणीत आणले.
#WATCH| Congress’ Rahul Gandhi in response to a question from ‘Bay Area Muslim community’ says,” The way you (Muslims) are feeling attacked,I can guarantee Sikhs,Christians,Dalits,Tribals are feeling the same. What is happening to Muslims in India today happened to Dalits in… pic.twitter.com/sukYLT9Ctp
— ANI (@ANI) May 31, 2023
भारतात आज मुस्लिमांची जी स्थिती आहे, ती बदलून पूर्वीसारखीच किंवा व्यवस्थित होण्याठी तुम्ही काय संदेश द्याल? असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना ते म्हणाले, या परिस्थितीबद्दल एकच ओळ आहे – नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान. आज जे काही घडत आहे, ते मुस्लिमांना सर्वात जास्त जाणवत आहे, कारण ते थेट त्यांच्यासोबत होत आहे. बहुतांश अल्पसंख्याकांसोबत घडत आहे. दलितांनाही असेच वाटत असणार असे खात्रीपूर्वक सांगू शकतो, असे राहुल गांधी म्हणाले.
80च्या दशकात यूपीमध्ये हीच स्थिती
देशात वेळोवेळी असेच घडत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. आज मुस्लिमांसोबत जे घडत आहे, ते 80च्या दशकात दलित समाजासोबत हे घडले होते. तुम्ही पाहिले तर, 80च्या दशकात यूपीमध्ये दलितांची जी स्थिती होती, तीच आज मुस्लिमांची आहे. अशी आव्हाने आपल्यासमोर येत राहतात आणि अशा आव्हानांना सामोरे जावे लागते, असे राहुल गांधी म्हणाले. 1980 ते 1989 अशी सलग नऊ वर्षे काँग्रेसचीच सत्ता उत्तर प्रदेशमध्ये होती, हे उल्लेखनीय.