अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरुन देशात गोंधळ सुरु आहे. परीक्षा घ्यायची की नाही याबाबत मतभेद आहेत. दरम्यान, यूजीसीने परीक्षा घेणं अनिवार्य आहे, असं म्हटलं आहे. यावर आता काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव देशात वाढत असताना अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणं चुकीचं आहे, असं काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
It is extremely unfair to conduct exams during the Covid19 pandemic.
UGC must hear the voice of the students and academics. Exams should be cancelled and students promoted on basis of past performance.#SpeakUpForStudents pic.twitter.com/1TYY3q58i0
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 10, 2020
हेही वाचा – कोरोनाचे मूळ शोधण्यासाठी WHO चीनमध्ये
कोरोनाचा प्रादुर्भाव देशभरात वाढत असताना अंतिम वर्षांच्या परीक्षांचं काय? हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र दोन दिवसांपूर्वीच यूजीसी आणि आरोग्य मंत्रालयाने कोरोनाबाबत दिलेल्या निर्देशांचं पालन करत अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायला हरकत नाही असं म्हटलं होतं. दरम्यान, गुरुवारी यूजीसीने परीक्षांची कार्यपद्धतीही जाहीर केली. यूजीसीच्या नियमांनुसार अंतिम वर्षाची परीक्षा घेणं अनिवार्य आहे, असं केंद्रीय गृह मंत्रलयाने म्हटलं. यूजीसीच्या निर्णयावरुन महाराष्ट्र सरकारने नाराजी व्यक्त केली आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या भवितव्यासाठी परीक्षा रद्द करणे हाच पर्याय योग्य आहे अशी भूमिका महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतली आहे.