‘पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सीबीआय चौकशीला का घाबरत आहेत?’ असा प्रश्न केंद्रिय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला आहे. ममता बॅनर्जींनी सध्या धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. हे आंदोलन ८ फेब्रुवारीपर्यंत असणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. रविवारी संध्याकाळी कोलकाता येथे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर सीबीआयच्या पथकाने छापा टाक्याचा प्रयत्न केले असता, पोलिसांनी सीबीआयला ताब्यात घेतले. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. या घटनेविषयी ममता बॅनर्जींना माहिती मिळताच त्या ताबडतोब राजीव कुमार यांच्या घरी दाखल झाल्या. सीबीआयच्या ४० जणांनी राजीव कुमार यांच्या घराला वेढा घातल्याचा आरोप ममता बॅनर्जींनी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या आदेशावर सीबीआय काम करत असल्याचा दावाही त्यांनी केला. यानंतर त्या मोदी सरकारच्या विरोधात धरणे आंदोलनाला बसल्या आहेत.
हेही वाचा – ममता बॅनर्जी आणि चिटफंड घोटाळा; जाणून घ्या यांचा संबंध
‘भ्रष्ट लोकांनी एकत्र येऊन युती केली’
याविषयी रवीशंकर प्रसाद यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ममता बॅनर्जी आणि त्यांच्या समर्थकांवर टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘या भ्रष्ट लोकांनी एकत्र येऊन युती केली आहे. कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना आधीच घोटाळ्यासंबंधी माहिती होती, असं दिसत आहे. जेव्हा तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना अटक झाली तेव्हा ममता बॅनर्जी शांत होत्या. पण पोलीस आयुक्तांची चौकशी होऊ लागल्यानंतर त्या धरणे आंदोलनाला का बसल्या आहेत?’, असा प्रश्न रवीशंकर प्रसाद यांनी विचारला. त्याचबरोबर ममता बॅनर्जी या अरविंद केजरीवाल यांच्या मार्गाचा अवलंब करत आहेत, असा टोलाही त्यांनी दिला.
Union Minister Ravi Shankar Prasad: What is happening? A Police Commissioner is sitting on a dharna with politicians? What is the meaning of this? By sitting on dharna West Bengal CM is following the footsteps of Arvind Kejriwal pic.twitter.com/QOwmBbqqbh
— ANI (@ANI) February 4, 2019