जगभर पसरणाऱ्या कोरोना विषाणूच्या महामारीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मध्यमवर्गींना मोठा दिलासा दिला आहे. ग्राहकांनी यापुढे सोने गहाण ठेवल्यास १५ टक्के अधिक कर्ज देण्याचा निर्णय आरबीआयकडून घेण्यात आला आहे. आता सोने गहाण ठेवल्यास सोन्याच्या एकूण ९० टक्के कर्ज देण्याच्या निर्णयाला आरबीआयने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता या संधीचा लाभ येत्या ३१ मार्च २०२१ पर्यंत घेण्यात येणार आहे. केंद्रीय बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक पार पडली त्यात या महत्त्वाच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे.
देशात सध्या कोरोना विषाणूने अक्षरश:कहर केला आहे. यामुळे अनेकांच्या नोकऱ्या, व्यवसाय, नवे उद्योग, लघु उद्योग यांना मोठा फटका बसला आहे. त्यांना दिलासा देण्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाद्वारे सोन्याचे दागिने गहाण ठेवून घेतल्या जाणाऱ्या बिगर कृषी कर्जांत किंमतीच्या ७५ टक्के कर्ज दिले जात होते. मात्र, आता यापुढे दागिन्यांच्या किंमतीच्या ९० टक्के इतके कर्ज दिले जाणार आहे.
१ लाखावर ९० हजारपर्यंत मिळणार कर्ज
सोन्या किंमतीत वाढ झाल्याने अनेकांनी सोने गहाण ठेवून कर्ज घेत आपला व्यवसाय सुरु ठेवला. याआधी १ लाख रुपयांचे सोने गहाण ठेवले का त्यावर ७५ हजारपर्यंत कर्ज मिळत होते. मात्र, आता १ लाख रुपयांचे सोने गहाण ठेवल्यास ९० हजारपर्यंत कर्ज मिळणार आहे.
हेही वाचा – COVID 19 tests: देशात आतापर्यंत २ कोटी २७ लाखाहून अधिक चाचण्या!