२०१८ साल ठरले आर्थिक घोटाळ्यांचे बँकांना ४१ हजार कोटींचा चुना

२०१८ साल ठरले आर्थिक घोटाळ्यांचे  बँकांना ४१ हजार कोटींचा चुना

प्रातिनिधिक फोटो

२०१८ हे वर्ष आर्थिक घोटाळेदारांचे ठरले आहे. मोठ्या-मोठ्या उद्योगपतींनी बँकांना चुना लावून देशाबाहेर पोबारा केला आहे. थोडेथोडके नव्हेतर या व्हाईट कॉलर दरोडेखोरांनी बँकांना तब्बल ४१ हजार कोटी रुपयांना लुटले आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षीच्या तुलनेत या आर्थिक घोटाळ्यांचे प्रमाण ७२ टक्क्यांनी वाढले आहे. ही माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या २०१७-२०१८ च्या आर्थिक अहवालातून पुढे आली आहे.

रत्ने आणि दागिने व्यापार्‍यांनी बँकांना सर्वाधिक गंडा घातला आहे. विशेष म्हणजे फसवणूक करणार्‍यांनी सरकारी बँकांना लक्ष्य केल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. सरकारी बँकांमध्ये फसवणुकीचे प्रमाण ९२.९ टक्के इतके आहे. फसवणुकीची सर्वाधिक प्रकरणे ही मुंबई, कोलकाता, दिल्ली या महानगरांमध्ये घडली आहेत. २०१८ साली ५ हजार ८३५ घोटाळे घडले आहेत. कर्ज घेण्यासाठी तारण म्हणून खोटी कागदपत्रे सादर करणे, चुकीचे पत्ते सादर करणे, बँकांमधील अधिकार्‍यांचे संगनमत अशापद्धतीने हे घोटाळे झाले आहेत.

आरबीआयची सेंट्रल फ्रॉड रजिस्ट्री ही ऑनलाईन यंत्रणा आहे. यामध्ये बँकांमध्ये सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळणी केली जाते. या यंत्रणेच्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षात बँकांमधील आर्थिक घोटाळे वाढल्याचे आरबीआयने वार्षिक अहवालात म्हटले आहे.

First Published on: January 1, 2019 7:39 PM
Exit mobile version