भारत-चीन सीमेवरील सुरक्षा अधिक कडेकोट, मोदी सरकारचा मोठा निर्णय

भारत-चीन सीमेवरील सुरक्षा अधिक कडेकोट, मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या अतिरेकी कारवायांवर नियंत्रण आणल्यानंतर चीनचाही बंदोबस्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आज, बुधवारी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे भारतीय सैन्याकडून दोनदा मार खाणाऱ्या चीन सैनिक पुन्हा कुरापती करणार नाही, अशी अपेक्षा आहे.

पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत आणि चीन यांच्यात वारंवार संघर्षाचे प्रसंग निर्माण झाले. मे-जून 2020 तसेच गतवर्षी डिसेंबर महिन्यात चिनी सैनिकांनी आगळीक केली होती. भारतीय जवानांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये लष्करी पातळीवरील चर्चेच्या अनेक फेऱ्याही झाल्या आहेत. हे सर्व ध्यानी घेता केंद्र सरकारने सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत इंडो-तिबेट सीमा पोलिसांच्या (आयटीबीपी) 7 नवीन बटालियनच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयानुसार 9 हजार 400 कर्मचाऱ्यांच्या या 7 नवीन बटालियनसह एका ऑपरेशनल बेसची स्थापना करण्यात येणार आहे.

भारत आणि चीन सैनिकांमधील संघर्ष वाढला
पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात पॅंगॉन्ग त्सो तलावाच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर 1 मे 2020 रोजी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत दोन्ही बाजूचे अनेक सैनिक जखमी झाले. येथून उभय देशातील तणाव वाढला. 15 जून आणि 16 जून 2020च्या मध्यरात्री उभय देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या मारामारीत जीवितहानी झाली होती. गलवान खोऱ्यातील संघर्ष हा भारत आणि चीन यांच्यातील चार दशकांतील सर्वात प्राणघातक संघर्ष होता.

त्यानंतर, 9 डिसेंबर 2022 रोजी अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमधील एलएसीनजीक यांगत्से येथे भारतीय जवान आणि चीनच्या पीएलएच्या (पीपल्स लिबरेशन आर्मी) सैनिकांमध्ये हाणामारी झाली. चिनी सैन्य यांगत्से भागात आल्यानंतर त्यांनी आधी झटापटीला सुरुवात केली. भारतीय जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर देत त्यांना पळवून लावले. त्यात अनेक चिनी सैनिक जखमी झाले.

First Published on: February 15, 2023 8:55 PM
Exit mobile version