आफताब देतोय तुकडे करुन ठार मारण्याची धमकी…; दोन वर्षांपूर्वीच श्रद्धाने केली होती तक्रार

आफताब देतोय तुकडे करुन ठार मारण्याची धमकी…; दोन वर्षांपूर्वीच श्रद्धाने केली होती तक्रार

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा हत्या प्रकरणात एक मोठा खुलासा झाला असून २०२० सालीच श्रद्धाने आफताबविरोधात वसई येथील तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे समोर आले आहे. श्रद्धाने तक्रारीत आफताबपासून जीवाला धोका असल्याचे यात म्हटले होते. त्याचबरोबर आफताब आपल्याला शरीराचे तुकडे करुन फेकून देईन अशा धमक्या देत असल्याचा आरोप श्रद्धाने केला होता. दरम्यान, पोलिसांनी वेळीच श्रद्धाच्या तक्रारीची दखल घेत आफताबवर कारवाई केली असती तर आज ती जिवंत असती अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर यूजर्स देत आहेत.

तसेच आफताब गेल्या सहा महिन्यांपासून आपल्याला शिवीगाळ आणि मारहाण करत आहे. आज त्याने मला ठार मारण्याचाही प्रयत्न केल्याचे श्रद्धाने या तक्रारीत म्हटले होते. तो सतत धमक्या देत असल्याने पोलिसात जाण्याची आपल्याला हिंमत होत नसल्याचेही तिने तक्रारीत म्हटले होते. तसेच मला होणाऱ्या मारहाणीबदद्ल आणि त्याने केलेल्या जीवे मारण्याच्या प्रयत्नाबद्दल त्याच्या कुटुंबीयांना माहित असल्याचेही तिने तक्रारीत सांगितले होते.

तसेच आफताबबरोबर राहण्याची आता इच्छा नसल्याचे आणि तो ब्लॅकमेल करत असल्याचे सांगत तिने जर माझे काही बरे वाईट झाले तर त्यास सर्वस्वी आफताबच जबाबदार असल्याचे तिने तक्रारीत म्हटले होते.

श्रद्धा आणि आफताबच्या रिलेशनशिपला दोघांच्या घरातून विरोध असल्याने मुंबईनंतर हे दोघे दिल्लीत लिव्ह इन मध्ये राहत होते. घरच्यांच्या ती संपर्कात नव्हती. १८ मे २०२२ रोजी आफताबने श्रद्धाची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून ते त्याने फ्रिजमध्ये ठेवले. नंतर सलग २० दिवस त्याने ते तुकडे मेहरोलीच्या जंगलात फेकले. दरम्यान, मे महिन्यानंतर श्रद्धाशी संपर्क न झाल्याने आणि आफताबही कॉल रिसीव्ह करत नसल्याने तिचा मुंबईतील मित्र लक्ष्मण नाडर याला संशय आला. त्याने याबाबत तिच्या भावाला सांगितले त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. सध्या आफताबला अटक करण्यात आली असून या घटनेचा तपास सुरू आहे.

 हत्येआधीचे श्रद्धाचे अखेरचे चॅट आले समोर

१८ मे रोजी हत्येच्या काही तासांआधीचे श्रद्धाचे आणि तिचा मित्र करण यांच्यातील इन्स्टाचॅट समोर आले आहे. यात श्रद्धाने त्याला माझ्याकडे मोठी न्यूज असल्याचे सांगितले. त्यानंतर तिने मी आता बिझी असल्याचा तिने मेसेज केला. पण मोठी न्यूज कोणती हे मात्र तिने करणला सांगितले नव्हते.

 

यामुळे करणने तिला पुन्हा कोणती म्यूज आहे असा मेसेज केला. पण मेसेज वाचला गेला मात्र त्यावर तिचा रिप्लाय आला नाही. हा श्रद्धाचा शेवटचा मेसेज ठरला. दरम्यान २४ सप्टेंबरला करणने तिला तू ठिक आहेस का असा मेसेज केला. पण मेसेज वाचले जात होते मात्र त्यावर रिप्लाय येत नव्हता. कारण आफताब श्रद्धाच्याच मोबाईलवरून तिचे इन्स्टाग्रॅम अकाऊंट हाताळत होता.

First Published on: November 23, 2022 1:04 PM
Exit mobile version