सर्पदंश झाल्यास, उत्तर प्रदेश सरकार देणार ४ लाख

सर्पदंश झाल्यास, उत्तर प्रदेश सरकार देणार ४ लाख

प्रातिनिधिक फोटो

सर्पदंश असो वा बोटीनं झालेला अपघात असो अशा कोणत्याही दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांना राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीमधून ४ लाख रूपये देण्याची घोषणा योगी आदित्यनाथ सरकारनं उत्तर प्रदेशमध्ये केली आहे. अशा तऱ्हेचे अपघात अथवा सांडपाणी स्वच्छतेदरम्यान झालेला अपघात वा वायू गळतीमधील मृत्यू यासारख्या घटनांमध्ये बळी पडणाऱ्या व्यक्तींना आता चार लाखांचे आर्थिक सहाय्य करण्यात येणार असल्याचं उत्तर प्रदेश सरकारमधील आपत्ती व्यवस्थापन विभाग आयुक्त संजय कुमार यांनी सांगितलं आहे.

सरकारनं केली सूचना निर्गमित

पावसाळ्यात अनेक लोकांची घरे कोसळली आणि बऱ्याच लोकांना सर्पदंश झाल्यामुळं मुख्यमंत्री आदित्यनाथ दुःखी असून गरजवंत लोकांना हे पैसे देण्यात येतील. तसंच विविध मुख्यालयांच्या अंतर्गत मदत धोरणानुसार ही योजना राबवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव मृत्युंजय कुमार यांनी सांगितलं असून यासंदर्भात सरकारनं सूचना निर्गमित केली आहे. आतापर्यंत पावसामुळं मृत झालेल्या, पुरानं उद्धवस्त झालेल्या, जखमी अशा व्यक्तींच्या नातेवाईकांना राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून पैसे देण्यात आले होते. अन्य नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीत हे नव्यानं समाविष्ट करण्यात आलेले नियम वापरून दुर्घटनेतील पीडित लोकांना वा त्यांच्या नातेवाईकांना लागू असतील, असंही कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.

मनुष्य – पशु संघर्ष ही आपत्ती

सर्पदंश होणं ही आता आपत्ती मानली जाणार असून उत्तर प्रदेश हे असं पहिलं राज्य आहे, जिथे यामध्ये माणूस दगावल्यास, ४ लाख रुपये मिळणार आहेत. या आपत्तीचं व्यवस्थापन करण्यासाठी सरकारची मदत होणार असल्याचं मुख्य वनरक्षक रमेश पांडे यांनी सांगितलं आहे. दरम्यान पावसाळ्यात साधारणतः प्रत्येक महिन्याला पाच ते दहा अशी सर्पदंशाची प्रकरणं येत असल्याचं वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सॅम मेसम यांनी सांगितलं आहे.

First Published on: August 5, 2018 7:03 PM
Exit mobile version