दक्षिण भारतावर दहशतवादी हल्ल्याची शक्यता – भारतीय लष्कर

दक्षिण भारतावर दहशतवादी हल्ल्याची शक्यता – भारतीय लष्कर

कलम ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर संताप व्यक्त करून खुलेपणाने आणि सीमाभागात शस्त्रसंधीचं उल्लंघन करत छुप्या पद्धतीने कारवाया करत असताना आता भारतीय लष्कराच्या हाती आणखीन एक माहिती लागली आहे. दहशतवादी आता दक्षिण भारतामध्ये काही ठिकाणी कारवाई करण्याची शक्यता लष्कराकडून वर्तवण्यात आली आहे. सर क्रीक भागातून लष्कराला काही रिकाम्या आणि संशयित अवस्थेतील बोटी सापडल्या आहेत. मात्र दहशतवाद्यांचे मनसुबे उलथवून टाकण्यासाठी सज्ज असल्याचं लष्कराकडून सांगण्यात आलं आहे. लेफ्टनंट जनरल सैनी यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.


हेही वाचा – भारतविरोधी कारवायांसाठी पाकिस्तानने मसूद अजहरला सोडलं?

सर क्रीकमध्ये सापडल्या बोटी

लेफ्टनंट जनरल सैनी यांनी पत्रकारांशी बोलताना यासंदर्भात दहशतवादी हल्ल्याचा इशारा दिला आहे. ‘भारताच्या दक्षिण भागामध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. काही रिकाम्या पडीक बोटी गुजरात आणि सिंध प्रांताची सीमारेषा असलेल्या सर क्रीकमध्ये सापडल्या आहेत. मात्र, दहशतवाद्यांची अशी कोणतीही योजना हाणून पाडण्यासाठी आम्ही तयार आहोत’, असं ते म्हणाले.

केरळमध्ये सतर्कतेचा इशारा

दरम्यान, लेफ्टनंट जनरल सैनी यांनी इशारा दिल्यानंतर केरळचे पोलीस महासंचालक लोकनाथ बेहेरा यांनी केरळमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. ‘भारतीय लष्कराने दिलेल्या इशाऱ्यानंतर राज्याच्या सर्व जिल्ह्यांना सतर्क राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातल्या सर्व पोलिसांना सार्वजनिक ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यास सांगण्यात आले आहे’, असं ते म्हणाले.

First Published on: September 9, 2019 6:30 PM
Exit mobile version