राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारने कायदा करावा

राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारने कायदा करावा

मोहन भागवत

नागपूर:राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारने कायदा करावा, असे सांगतानाच राजकारणामुळे राम मंदिराची निर्मिती रखडली असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ते संघाच्या विजयदशमी उत्सवात येथे बोलत होते. राम फक्त हिंदूंचे नाहीत, ते संपूर्ण देशाचे आहेत. त्यामुळे राम मंदिराची उभारणी व्हायला हवी. राम मंदिर उभारले गेले तर देशात सद्भावनेचे वातावरण निर्माण होईल, असे सरसंघचालक म्हणाले.केंद्रात सत्ता असली तरी राम मंदिराचे काम का होत नाही, असे विचारले जाते.

मोहन भागवत यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि नानक यांच्या शिकवणीचा उल्लेख करत, भारतीय लष्कर आणखी सक्षम करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. ’एससी-एसटी’ समाजातील वंचित घटक, पीडितांना आणखी सक्षम करण्याची गरज आहे. देशभरातील छोट्या-मोठ्या आंदोलनांमध्ये भारताचे तुकडे होणार म्हणणारे लोक दिसले. सोशल मीडियावर त्याचा जोरदार प्रचार केला जात आहे. त्यासाठीचा मजकूर पाकिस्तान, इटली, अमेरिकेतून पुरवला जातो. समाजात निर्माण झालेला असंतोष दूर करायला हवा. दबलेल्या-पिचलेल्या लोकांना त्यांचे अधिकार द्यायला पाहिजेत, असेही सरसंघचालक म्हणाले.

भारत पंचामृताच्या मंत्राच्या आधारे पुढे गेला, तर नक्की महागुरू होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कोणीही आमचं शत्रू नाही. आम्ही कोणालाही शत्रू मानत नाही. मात्र जगातील अनेकजण आम्हाला शत्रू मानतात, असं सरसंघचालक म्हणाले. पाकिस्तानात सत्ता परिवर्तन झालं. मात्र त्यांच्या कृती आणि कारवायांमध्ये फरक पडलेला नाही. कोणीही आपल्यावर हल्ला करण्याचा विचारसुद्धा करु शकणार नाही, इतकं सामर्थ्यशाली आपण व्हायला हवं, असं सरसंघचालक भागवत यांनी म्हटले.

स्वतंत्र भारताचे पहिले सरकार विदेशात स्थापन झाले. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. या घटनेला आता दीडशे वर्षे झाली आहेत, असे सांगताना मोहन भागवत यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच सत्य, अहिंसेच्या तत्त्वावर राजकारण फक्त भारतीयच करू शकतात असे स्पष्ट करत भागवत यांनी महात्मा गांधींच्या कार्याचा गौरव केला.

First Published on: October 19, 2018 12:39 AM
Exit mobile version