उपासमारीमुळे ३ मुलींचा मृत्यू, दिल्लीतला धक्कादायक प्रकार!

उपासमारीमुळे ३ मुलींचा मृत्यू, दिल्लीतला धक्कादायक प्रकार!

(फोटो सौजन्य : नवजीवन)

दिल्लमध्ये एकाच कुटुंबातल्या तीन मुलींचा उपासमारीने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या दिल्लीतल्या मंडावली या ठिकाणी एकाच कुटुंबातील तीन चिमुकल्या मुलींचा मंगळवारी दुर्दैवी मृत्यू झाला. शिखा (८), मानसी (४) आणि दोन वर्षांची पारुल अशी या मुलींची नावे असून या चिमुरड्यांचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, उपासमारीमुळे हे मृत्यू झाल्याची गंभीर दखल दिल्ली सरकारने घेतली आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिल्ली सरकारने दिले आहेत.

नेमके काय घडले?

हे कुटुंब बंगालचे असल्याची माहिती शेजारणीने दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे कटुंब वडिलांच्या मित्रासोबत दिल्लीला आले होते. मंडावली या ठिकाणी हे कुटुंब राहायचे. आई, वडील आणि तीन मुली असा हा परिवार होता. मंगळवारी शेजारचे या कुटुंबाच्या घरी गेले असता या घरातील तिनही मुली बेशुद्ध होऊन पडल्या होत्या. आई मानसिक रुग्ण असल्याने त्यांना आपल्या मुली बेशद्ध अवस्थेत असल्याचे कळले देखील नाही. शेजारी त्यांना लालबहादूर रुग्णालयात उपचाराकरता घेऊन गेले असता डॉक्टरांनी मुली मृत असल्याचे घोषित केले आहे. त्यानंतर मुलींचा मृतदेह शवविच्छेदनाकरता पाठवण्यात आला. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार मुलींच्या पोटात काहीच नसून त्या सलग आठ दिवस उपाशी असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

वडिलांचा तपास सुरु

या मुलींचे वडील रिक्षा चालक होते. काही दिवसांपूर्वी त्यांची रिक्षा चोरीला गेली होती. त्या दिवसापासून ते नोकरीच्या शोधात होते. अखेर नोकरी मिळावी याकरता ते घराच्या बाहेर पडले. मात्र ते अद्याप घरी परतलेले नाही. दरम्यान, या सर्व माहितीच्या आधारावर पोलिस मुलींच्या वडिलांचा कसून शोध घेत आहेत.

First Published on: July 26, 2018 2:08 PM
Exit mobile version