देशात अंतिम वर्षांच्या परीक्षांवरुन गोंधळ सुरु आहे. यूजीसीने परीक्षी अनिवार्य केल्यानंतर अनेक राज्यांनी टीका केली. दरम्यान, आता विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत सुरू असलेल्या वादात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं (एआयसीटीई) यूजीसीचं समर्थन केलं आहे. “आयोगाच्या सूचनेनुसार तंत्रशिक्षण संस्थांनी परीक्षा घ्याव्यात, अशी सूचना संस्थांना केली आहे,” असं प्रतिज्ञापत्र ‘एआयसीटीई’ने उच्च न्यायालयात दाखल केलं आहे.
विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याच्या शासनाच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत ‘एआयसीटीई’ने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. तंत्रशिक्षण संस्थांनी ‘यूजीसी’च्या सूचनेनुसार परीक्षा घेणं आवश्यक असल्याचं ‘एआयसीटीई’ने म्हटलं आहे. “आयोगाने विद्यार्थ्यांचं हित आणि सुरक्षा या दोन्हींचा विचार करून सूचना केल्या आहेत. त्या सूचना एआयसीटीईने स्वीकारल्या आहेत,” असं या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे.