देशातील हवामानात गेल्या अनेक दिवसांपासून मोठे पदल पाहायला मिळत आहे. ऐन थंडीच्या दिवसातही महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पावसाने थैमान घातले होते. तर थंडीचा कहर कमी होत्या दिवसात आता बर्फवृष्टी, गारपीठ अन् अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अशातच नववर्षाची सुरुवातही यंदा अवकाळी पाऊस, गारपीट अन् थंडीने होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण देशभरातील अनेक राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे तर काही भागांत बर्फवृष्टी आणि गारपिटीला सुरुवात झाली आहे.
विदर्भ, मराठवाड्यात गारपिट अन् मुसळधार पाऊस
महाराष्ट्रात काही ठिकाणी खासकरुन विदर्भ आणि मराठवाड्यात पावसासह गारपिटीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानुसार मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाला सुरुवात झाली तर अकोला, अहमदनगर, भंडारा आणि यवतमाळ अशा अनेक ठिकाणी मुसळधार पावसासह गारपिटीला सुरुवात झाली आहे.
अकोल्यात मंगळवारपासून गारपिटीसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. तर ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी गारपिटी झाली. अचानक झालेल्या या हवामान बदलाचा सामना आता शेतकऱ्यांना करावा लागतोय. यामुळे काढणीला आलेलं उभं पिक गारपिट, पावसामुळे खराब होतय. यात रब्बीतील हरभरा, गहू आणि तूर पिकांचं देखील मोठं नुकसान झालंय.
शेतकरी मात्र मेटाकूटीला
अकोला, अहमदनगर, भंडारा, यवतमाळ अशा अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गारपिट आणि पावसामुळे शेतकरी मात्र मेटाकूटीला आला आहे. यातच हवामान खात्याने नव्या वर्षात राज्यात पुन्हा हुडहूडी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली.
महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानातही पुढील २४ तासांत हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या बदललेल्या हवामानाचे कारण लडाख आणि आसपासच्या भागावर वेस्टर्न डिस्टर्बन्स असल्याचे मानले जाते.
दिल्लीतील थंडी आणखी वाढणार
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, यंदा नवीन वर्षात थंडीचा जोर वाढणार असून हवामानात सतत बदल जाणवणार आहे. यात उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये आता थंडीने जोर पकडला आहे. मंगळवारच्या पावसानंतर दिल्लीत थंडी वाढली आहे. मात्र पर्यटक याचा भरपूर आनंद घेत आहेत. मात्र उद्यापासून दिल्लीतील थंडी आणखी वाढणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. किमान तापमानात ३ ते ४ अंशांनी घसरण होऊ शकते. त्याचबरोबर उद्या धुकेही पडण्याची शक्यता आहे.
उत्तराखंडमध्ये कडाक्याची थंडी आहे. त्याचवेळी, नैनिताल तलाव शहरात काल संध्याकाळपासून हलकी बर्फवृष्टी सुरू आहे. नैनितालमध्ये गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते, त्यामुळे शहराच्या तापमानातही घट झाली आहे. मोठ्याप्रमाणात झालेल्या बर्फवृष्टीने जोशीमठ ते औलीला जोडणारा मोटार रस्ता निसरडा झाला आहे. त्यामुळे शेकडो वाहने कुठे अडकून अपघाताचे बळी ठरत आहेत.
राजस्थानमध्ये थंड वातावरण
राजस्थानच्या जोधपूरमध्ये हवामानात अचानक बदल झाला. अनेक ठिकाणी पाऊस आणि गारपिटीमुळे तापमानात घट झाली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पाऊस आणि थंडीच्या लाटेच्या प्रभावामुळे येत्या काही दिवसांत उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये थंडी वाढण्याची शक्यता आहे. डोंगराळ राज्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टी अपेक्षित आहे.