कोरोना विरोधी लस देण्याचे रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या भारताची लसीकरणातील गती पाहून जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारताचे जाहीरपणे कौतुक केलंय. WHO च्या दक्षिण पूर्व आशिया क्षेत्राचे निदेशक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह यांनी भारताची लसीकरणातील गती अत्यंत उल्लेखनीय असल्याचं म्हटलंय.
डॉ. सिंह म्हणाल्या की, भारताला पहिल्यांदा १०० दशलक्ष डोस देण्यासाठी ८५ दिवस लागले होते. मात्र, आता अवघ्या १३ दिवसांत डोसची संख्या ६५० ते ७५० दशलक्षपर्यंत पोहोचलीय. डॉ. सिंह यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिलीय. कोरोनाविरोधातील लसीकरणाची गती अत्यंत वेगाने पुढे जातेय. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले की, देशातील एकूण लसीकरणाचा आकडा हा ७५ कोटींवर गेला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देशाने ७५ कोटी लसीकरणाचा आकडा ओलांडलाय.
लसीकरणाचा वेग पाहता महिनाभरात देशात १०० कोटी नागरिकांना लसीचा किमान एक तरी डोस दिला जाईल. आजवर झालेल्या एकूण लसीकरणातील सुमारे ५७ कोटी लोकांना केवळ एक डोस मिळालाय आणि १८ कोटी नागरिकांना दोन डोस मिळालेले आहेत.