वनराईचे संस्थापक समाजसेवक मोहन धारिया

वनराईचे संस्थापक समाजसेवक मोहन धारिया

मोहन धारिया यांचा आज स्मृतिदिन. मोहन धारिया हे भारताचे माजी केंद्रीय मंत्री व वनराई या संस्थेचे संस्थापक होते. त्यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९२५ रोजी रायगडमधील नाते या गावी झाला. त्यांचे वडील मूळचे गुजरातचे, पण ते व्यवसायानिमित्त कोकणात स्थायिक झाले होते. मॅट्रिक परीक्षेनंतर त्यांचे पुढील शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे झाले. त्यांनी महाड येथे सेवादलात असताना वयाच्या १६ व्या वर्षी १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला.

त्यावेळी त्यांना शिक्षाही झाली होती. पुणे विद्यापीठाची कायद्याची पदवी घेऊन ते मुंबई हायकोर्टात वकील म्हणून काम करून लागले. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ‘लोकसेना’ नावाची संस्था सुरू केली. आपल्या नेतृत्व कौशल्याच्या जोरावर त्यांनी शेकडो तरुणांना संघटित केले. शिवाय वेगवेगळ्या संघटनांना एकत्र आणून त्यांनी पुण्यात ‘नॅशनल लेबर सेंटर’ची स्थापना केली. ते १९५७ ते १९६० या काळात पुणे महापालिकेत नगरसेवक होते.

१९६४ ते १९७० या काळात ते भारताच्या राज्यसभेचे सदस्य झाले. १९७१ ते १९७९ या काळात ते दोन वेळा लोकसभेचे सदस्य व १९७१ ते १९७५ या दरम्यान योजना, बांधकाम, गृहनिर्माण व नगरविकास या खात्यांचे राज्यमंत्री झाले. पुढे केंद्रीय मंत्री झाल्यावर वाणिज्य, ताग, कापड, नागरी पुरवठा व सहकार या खात्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्या वेळी रोजगारनिर्मिती, लोकसंख्या, रास्त दरात अन्नधान्य, पायाभूत सुविधा यांसह विविध विषयांवर त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेऊन धारियांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला त्यांनी १९८३ च्या सुमारास ‘वनराई’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे उद्दिष्ट लोकसहभागातून विकास साधणे हे होते. या संस्थेतर्फे सुमारे २.५ कोटींपेक्षा जास्त रोपांचे शेतकर्‍यांना वाटप करण्यात आले. ते अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत होते व तरुणांचे प्रेरणास्थान होते.अशा या थोर समाजसेवकाचे १४ ऑक्टोबर २०१३ रोजी निधन झाले.

First Published on: October 14, 2022 4:00 AM
Exit mobile version