वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

म्हणौनि कृपा आकळिला | दिसतसे अति कोमाइला | जैसा कर्दमीं रुपला | राजहंस //
जसा राजहंस पक्षी चिखलात रुतल्यावर म्लान दिसतो, तसा तो ममतेने व्याकुळ होऊन अगदी म्लान दिसू लागला.
तयापरी तो पांडुकुमरु । महामोहें अति जर्जरु। देखोनी श्रीशार्ङ्गधरु काय बोले //
त्याप्रमाणे तो अर्जुन महामोहाने ग्रस्त झालेला पाहून भगवान श्रीकृष्ण म्हणाले:-
म्हणे अर्जुना आदि पाहीं | हें उचित काय इये ठायीं | तूं कवण हें कायी। करीत आहासी //
अर्जुना, अरे तू अगोदर असे पहा की, या प्रसंगी तुला हे शोभते काय? तू कोण आहेस व हे काय करीत आहेस, याचा अगोदर विचार कर.
तुज सांगे काय जाहलें । कवण उणें आलें | करितां काय ठेलें । खेदु कायिसा //
तुला काय झाले? सांग बरे कोणते कमी पडले?
तूं अनुचिता चित्त नेदिसी। धीरु कहीं न संडिसी । तुझेनि नामें अपयशी | दिशा लंघिजे //
काय करण्याचे राहिले? आणि दुःख कशाकरिता झाले? तू अनुचित गोष्टीकडे कधी लक्ष देत नाहीस व कधीही धीर सोडीत नाहीस. तुझे केवळ नाव ऐकूनच अपयश लांब पळून जाते.
तूं शूरवृत्तीचा ठावो क्षत्रियांमाजीं रावो । तुझिया लाठेपणाचा आवो | तिहीं लोकीं //
तू शौर्याचा केवळ निधी व क्षत्रियांचा मुगुटमणी आहेस व तुझ्या शौर्याचा डंका त्रैलोक्यात गाजत आहे.
तुवां संग्रामीं हरु जिंकिला । निवात -कवचांचा ठावो फेडिला । पवाडा तुवां केला गंधर्वांसी //
तू युद्धात शंकरास जिंकिलेस; साडेतीन कोटी निवातकवच दैत्यांचा समूळ उच्छेद केलास; आणि चित्ररथगंधर्वांदिकांशी युद्ध करून त्यांना आपले यश गावयास लाविलेस.

First Published on: February 15, 2023 1:36 AM
Exit mobile version