सलमानचा ‘भारत’ शेवटी मिळाला ‘सुंदर आणि सुशील’ अभिनेत्रीला

सलमानचा ‘भारत’ शेवटी मिळाला ‘सुंदर आणि सुशील’ अभिनेत्रीला

सलमान आणि कतरिना

प्रियांका चोप्रा ‘भारत’ चित्रपटातून बाहेर झाल्यानंतर आता नक्की या चित्रपटाची हिरॉईन कोण? याचीच सगळ्यांना उत्सुकता होती. मात्र आता यावरचा पडदा उठला असून, सलमान खाननं सोमवारी अधिकृत घोषणा ट्विटरवर केली आहे. ‘एक सुंदर आणि सुशील मुलगी जिचं नाव आहे कतरिना कैफ, स्वागत आहे तुझं ‘भारत’च्या आयुष्यात,’ असं ट्विट करत एखाद्या जाहिरातीच्या अंदाजात सलमान खानने ही घोषणा केली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतक्या सर्व घडामोडीनंतर शेवटी ‘भारत’ चित्रपटाला हिरॉईन मिळाली आहे.

भारतची लाईफलाईन आहे कतरिना

सलमान खाननं ट्विट केल्यानंतर चित्रपटाचा दिग्दर्शक अली अब्बास जाफरनंदेखील ट्विट करत या गोष्टीला पुष्टी दिली आहे. ‘@Bharat_TheFilm भारतची लाईफलाईन आहे कतरिना कैफ’ असं ट्विट करत कतरिनाचं स्वागत केलं आहे. प्रियांका चोप्रानं हा चित्रपट सोडल्याची माहितीदेखील अली अब्बास जाफरनंच ट्विट करून दिली होती. कतरिनाबरोबर काम करण्यासाठी दिग्दर्शक अली अतिशय उत्साही असून या त्रिकूटाचे आधीचे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर तुफान चालले आहेत. तर यावेळी प्रतिभाशाली अभिनेत्रीबरोबर काम करणं हा खूपच चांगला अनुभव असेल असंही मत अलीनं व्यक्त केलं आहे.

‘भारत’ हा सलमान आणि अलीचा ड्रीम प्रोजेक्ट

‘भारत’ हा चित्रपट सलमान खान आणि अली जाफर दोघांचाही ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. साऊथ कोरियन ‘ओ टू माय फादर’ या चित्रपटाचा हा रिमेक आहे. या चित्रपटामध्ये १९५० ते २०१४ चा कालावधी एका सामान्य नागरिकाच्या नजरेतून पडद्यावर चित्रीत करण्यात आला आहे. ‘भारत’ची कथाही अशाच स्वरूपाची आहे. यामध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतरचा आतापर्यंतचा कालावधी सलमानच्या भूमिकेच्या नजरेतून दाखवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

First Published on: July 31, 2018 2:16 PM
Exit mobile version