‘चारचौघी’ पुन्हा येतायत प्रेक्षकांच्या भेटीला

‘चारचौघी’ पुन्हा येतायत प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी नाट्य सृष्टीमध्ये वेगवेगळ्या आशयाच्या नाटकांनी आजपर्यंत रसिक प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. पण काही नाटकं अशी असतात जी नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. त्याचप्रमाणे ‘चारचौघी'(charchoughi) हे नाटक सुद्धा अजूनही प्रेक्षकांच्या मनात ताजं तवानं आहे. हे नाटक पुन्हा एकदा प्रेक्षक भेटीसाठी रंगमंचावर येत आहे असं नाटकाचे दिगदर्शक चंद्रकांत कुलकर्णी(chandrakant kulkarni) म्हणाले. नाटकातील चार स्त्रिया, पण त्या नेहमीच्या चारचौघींप्रमाणे नाहीत. एक वेगळा निर्णय घेणारी आई आणि वेगळे निर्णय घेणाऱ्या तिच्या तीन मुली आहेत. यांच्या भोवती फिरणाऱ्या या नाटकाची कथा आणि ह्या व्यक्तीरेखा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

15 ऑगस्ट 1991 साली, म्हणजे तब्बल 31 वर्षांपूर्वी एक नाटक रंगभूमीवर अवतरलं होतं. प्रशांत दळवी(prashant dalavi) लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी यांचं दिग्दर्शन लाभलेल्या या नाटकाचं नाव होतं ‘चारचौघी’. नाव जरी ‘चारचौघी’ असलं तरी त्यातल्या त्या चारचौघी नेहमीच्या चौकटीतल्या चारचौघी नव्हत्या. त्या चारचौघींनी तत्कालीन समाजमनाला घुसळून काढलं, नातेसंबंधांवर विचार करायला भाग पाडलं. समीक्षकांनी तर ‘काळाच्या पुढचं नाटक’ अशीच त्याची गणना केली. या नाटकाला बंडखोर म्हटलं गेलं आणि ती बंडखोरी त्यांच्या विचारांनी , त्यांच्या कृतीने दाखवून देणारी होती. त्यामुळे ते काळाच्या पुढचं आहे असं म्हटलं गेलं. नाटकाचे प्रयोगांवर प्रयोग होत गेले. नाटकाच्या प्रयोगांनी हजारचा आकडा पार करून केंव्हा पुढे निघून गेले हे कळलंही नाही. सलग सात वर्षे हा सिलसिला चालू होता. याचं कारण आशयपूर्ण संहिता, संवाद आणि हे सारं प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणारे ताकदीचे कलाकार.

या नाटकात सुरुवातीच्या काळात दिपा लागू , वंदना गुप्ते(vandana gupte), आसावरी जोशी(asavari joshi), प्रतिक्षा लोणकर, सुनिल बर्वे(sunil barve) अशा ताकदीच्या कलावंतांची मांदियाळी होती तर, नाटकाच्या या कारकरांच्या संचात रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे(mukta barve), कादंबरी कदम, पर्ण पेठे, श्रेयस राजे, निनाद लिमये, आणि पार्थ केतकर हे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘चारचौघी’ या नाटकाला आताही तेवढाच उदंड प्रतिसाठी मिळेल यात शंकाच नाही.


हे ही वाचा – भारतातील पहिला बहुभाषिक ओटीटी पुरस्कार सोहळा मुंबईत संपन्न

 

First Published on: September 17, 2022 1:53 PM
Exit mobile version