सर्वकाही गुरुसाठी

सर्वकाही गुरुसाठी

sarvkahi gurusathi

रमेश कोळी याने भरतनाट्यम्, कुचिपुडी या नृत्यप्रकारांचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले आहे आणि सध्या अंबरनाथमध्ये नृत्यकलांजली या नावाने त्याची संस्था कार्यरत आहे. पण गेली दहा वर्षे त्याला कोणताही कार्यक्रम करायचा झाला तर तो थेट मुंबई गाठतो. बर्‍याचवेळा रविंद्र नाट्य मंदिरमध्येच कार्यक्रम करणे तो पसंत करतो. त्यासाठी दोन चार कारणे आहेत. एकतर सुसज्ज असा रंगमंच अंबरनाथमध्ये उपलब्ध नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पद्मश्री प्राप्त शास्त्रीय गुरुंना एवढ्या लांब निमंत्रित करता येत नाही. आपली कला गुरुंकडे रुजू व्हावी यासाठी पन्नास-साठ कलाकारांचा ताफा शिवाय त्यांचे दोनशे-तीनशे पालक यांना मुंबईतच येण्याचे निमंत्रण देतो. हे त्याचे विचार त्याचा प्रत्येक शिष्य अंमलात आणेलच याची खात्री देता येत नाही. एखाद्या नृत्यांगणेचा अरंगेत्रम् म्हणजे एकप्रकारचा लग्नसोहळाच असतो. नातेवाइकांना बोलावणे, त्यांच्या समोर अवगत केलेली कला सादर करणे असे काहीसे त्याचे स्वरुप असते.

रमेश आपल्या गुरुंसाठी जर थेट मुंबई गाठत असेल तर शिष्य म्हणून मला अनुकरण करायला काय हरकत आहे. ज्योती कांबळे या नृत्यांगणेने हा सोहळा मुंबईत घडवून आणण्याला दुजोरा दिला. शास्त्रीय नृत्याचे शिक्षण घेणार्‍या बर्‍याचशा मुली अरंगेत्रम् आपल्या पालकांच्याच निगरानीत करत असतात. पुढे लग्न झाल्यानंतर जीवनात येणारा साथीदार ही हौस पुरवेलच याची खात्री देता येत नाही. पण ज्योतीचा पती रामानंद कांबळे याने अवघ्या सहा वर्षांतच तिची ही हौस पूर्ण करून तिला पूर्णपणे या क्षेत्रात करिअर करण्याची मुभा दिली. असा निर्णय क्वचितच पतीकडून घेतला जातो. इतकेच काय तर तिच्या गुरुच्या आग्रहाखातर त्याने हा सोहळा मुंबईत करण्यासाठी पुढाकार घेतला होता. या निमित्ताने संपूर्ण अंबरनाथकर मुंबईत दाखल झाले होते. सर्वकाही गुरुसाठी असाच काहीसा अनुभव या सोहळ्यात पहायला मिळाला होता.

First Published on: April 15, 2019 4:27 AM
Exit mobile version