भारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदी गोपाळ यांच्या जीवनावर आधारीत आनंदी गोपाळ हा चित्रपट काही दिवासांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र ज्यांनी स्त्री शिक्षणला सुरूवात केली, ज्यांनी स्त्रीमुक्तीसाठी प्रयत्न केला असे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट लवकरच रूपेरी पडद्यावर साकारणार आहे. या थोर समाजसुधारक दाम्पत्यांची यशोगाथा दिग्दर्शक समीर विद्वांस रूपेरी पडद्यावर घेऊन येणार आहेत.
आनंदीगोपाळ यांचा संघर्षमय प्रवास सगळ्याच मराठी प्रेक्षकांना भावला. आनंदीबाईंनी शिक्षण घेण्यासाठी केलेला संघर्ष बघताना प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी आलं. आनंदी गोपाळ हा चित्रपट रूपेरी पडद्यावर आल्यामुळे आपला इतिहास प्रेक्षकांसमोर आला. लवकरच सावित्रीबाई फुले यांच्यावर चित्रपट बनवणार असल्याचं दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी सोशलमिडीयावरून जाहीर केलं आहे.
काय आहे पोस्टमध्ये
समीर विद्वांस लिहतो, आनंदीगोपाळ च्या वेळी खूप सारं वाचताना एक गोष्ट परत परत जाणवत राहिली की आपल्याला इतिहास नीट शिकवलाच गेला नाही. सनसनावळ्यात अडकून राहिलो पण अनेक थोर व्यक्तिमत्वांशी आपली ओळख करूनच दिली नाहिये. त्यातलेच एक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. त्यांचं आयुष्य मी नीट वाचलं आणि मी हेलावून गेलो.आणि तेव्हाच मनात ठरवलं की आपण जर आनंदीगोपाळ ची गाथा सांगत असू तर ज्योतिबासावित्रीची गाथा सांगायलाच हवी होती, कधीच. पण उशीर झाला असं काही नाही. मी स्वत:लाच एक वचन दिलंय की मी ज्योतिबासावित्री (विशेषत: सावित्रीबाईंची) गाथा सांगणारच. लगेच नाही. थोड्या काळाने. पण काम सुरू करायला काय हरकत आहे? मी काम सुरू केलंय. थोडा वेळ लागेल. अशीच दोन एक वर्ष. वर्तमानात वावरतो आधी…पण मी ‘सावित्री’ ची कथा सांगणार हे नक्की.
या आधी महात्मा फुले यांच्या जीवनावर आचार्य अत्रे यांनी १९५४ मध्ये चित्रपटाची निर्मिती केली होती. आता समीरने आनंदी गोपाळ ज्या प्रमाणे प्रेक्षकांसमोर उभा केला. त्याचप्रमाणे महात्मा फुले यांचा जीवनपट समीर कशाप्रकारे मांडणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.