मुंबई : रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून कारमध्ये मागे बसणाऱ्या प्रवाशांनाही सीटबेल्ट लावणे बंधनकारक करण्यात येणार आहे. हा नियम मोडणाऱ्यांकडून मोठी दंडवसुली करण्यात येणार आहे. त्यावर अभिनेत्री पूजा भट हिने रस्त्याच्या स्थितीबद्दल टिप्पणी केली आहे.
All this talk of seat-belts & air bags. Important? Yes! But more so is fixing potholes & damaged roads. When will the usage of substandard material to build our roads,highways,freeways be deemed criminal. Also maintaining those roads once built & inaugurated with pomp is key 🙏
— Pooja Bhatt (@PoojaB1972) September 7, 2022
प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा रस्ते अपघातात जागीच मृत्यू झाला. मागच्या सीटवर बसलेल्या मिस्त्री यांनी सीट-बेल्ट लावला नसल्याचे समोर आले. अशा प्रकारचे अपघात होतच असल्याने केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. यापुढे कारमध्ये मागे बसणाऱ्या प्रवाशांनाही सीटबेल्ट लावणे बंधनकारक करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून येत्या तीन दिवसांत याबाबत अधिकृत आदेश जारी केला जाणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. केंद्रीय मोटार वाहन नियमाच्या (CMVR) नियम 138(3) अंतर्गत हा नियम करण्यात येणार आहे.
केंद्रीय मोटार वाहन नियमाच्या (CMVR) नियम 138(3) नुसार, कारमध्ये कंपन्यांकडून सीटबेल्ट प्रदान केला जातो. मात्र, कारमध्ये पुढे बसलेलेच प्रवासी आणि चालक सीटबेल्ट वापरतात. मागे बसलेले प्रवासी सीटबेल्ट लावत नाहीत. त्यामुळे पाच सीटर कारमध्ये मागे बसणाऱ्या प्रवाशांनी सीटबेल्ट लावणे बंधनकारक करण्यात येणार आहे. तसेच, सात सीटर कारसाठीही हा नियम लागू असेल. त्यानुसार, कारमध्ये मागे बसलेल्या प्रवाशांनी सीटबेल्ट लावला नाही तर त्यांना एक हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे, असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. त्याची अंमलबजावणी राज्य सरकारांना करावी लागणार आहे.
या निर्णयाचे विविध स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. मात्र काही जणांकडून त्याबाबत प्रश्नचिन्हही लावले जात आहे. अभिनेत्री पूजा भट्टने देखील आपल्या ट्विटर हॅण्डलवरून प्रतिक्रिया दिली आहे. सीट-बेल्ट आणि एअर बॅग्जवर सर्वत्र चर्चा सुरू आहे. हे महत्त्वाचे आहे का? हो. पण त्यापेक्षाही महत्त्वाचे आहे ते खराब रस्ते दुरुस्त करणे आणि रस्त्यांवरील खड्डे बुजवणे. रस्ते, हायवे, फ्रीवे तयार करताना निकृष्ट दर्जाची सामग्री वापरणाऱ्यांना कधी गुन्हेगार मानले जाईल?, असा सवाल तिने उपस्थित केला आहे. शिवाय, रस्ता तयार झाल्यानंतर गाजावाजा करत त्याचे उद्घाटन केले जाते, पण त्याची देखभाल-दुरुस्ती करणेही गरजेचे आहे, असे तिने म्हटले आहे.