मराठी टेलिव्हिजनवरील ‘देवमाणूस’ या मालिकेने अल्पावधीतचं यशाचे शिखर गाठले. मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. पण ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी एक नवीन गूढ रहस्यमय मालिका सुरु होणार आहे. मालिकेचं नाव आहे ‘ती परत आलीये’. नुकताच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला. थरारक अशा ट्रेलरमुळे प्रेक्षकांच्या मनात मालिकेबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे.
झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर या नव्या मालिकेचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. जेष्ठ अभिनेते विजय कदम या मालिकेत एका वेगळ्या आणि लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे बऱ्याच वर्षानंतर विजय कदम मालिका विश्वात पुनरागमन करत आहेत. या नव्या ट्रेलरमध्ये विजय कदम एका परिसरात गस्तीवर असतात. आणि त्या परिसरात यापूर्वी अनेक हत्या झालेल्या असतात. त्यामुळे सावध रहा असा इशारा देताना ते दिसतायं. विजय कदम यांच्यासह मालिकेत आणखी कोणते कलाकार दिसणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे.
लोकप्रिय ‘देवमाणूस’ मालिकेचे लेखल स्वप्नील गांगुर्डे यांनीच ‘ती परत आलीये’ या मालिकेचे लेखन केले आहे. त्यामुळे ही मालिका देखील प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करेल यात शंकाच नाही.
या मालिकेबद्दल बोलताना विजय कदम म्हणाले की, “या मालिकेत एक रहस्यमय भागातील गूढ प्रेक्षकांना पाहायला मिळेल. इकडे आलेल्या लोकांचं काही रहस्य आहे का? ती परत आलीये म्हणजे नक्की कोण आलीये? या प्रश्नाची उत्तर प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत. एका रहस्यमय मालिकेत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. माझी भूमिका नक्की काय आहे, हे सगळ्यांना लवकरच कळेल.” ही मालिका १६ ऑगस्ट पासून रात्री १०.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकही ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहेत.