लेखक आर.के. नारायण

लेखक आर.के. नारायण

रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म १० ऑक्टोबर १९०६ रोजी तामिळनाडू राज्यातील मद्रास (आताचे चेन्नई) या ठिकाणी झाला. ते आठ भावंडांपैकी (सहा मुले आणि दोन मुली) एक होते. नारायण यांचे वडील हे स्कूल टीचर होते. नारायण यांच्या वडिलांची सतत बदली होत असल्यामुळे ते त्यांची आजी पार्वती जवळ राहिले. या काळामध्ये त्यांचे जवळचे मित्र आणि सवंगडी हे मोर आणि काही खोडकर माकडे होती. त्यांच्या आजीने नारायण यांना ‘कुंजापा’ हे टोपण नाव दिले होते. कुटुंबामध्ये त्यांना याच नावाने ओळखले जात असे. आजीने त्यांना भारतीय शास्त्रीय संगीत, संस्कृत, गणित, पुराणे इत्यादी विषय शिकवले. आजीकडे राहत असताना नारायण यांचे शालेय शिक्षण मद्रास येथील लुथेरिअन मिशन स्कूल, सी. आर. सी. हायस्कूल आणि द ख्रिस्तीयन कॉलेज हायस्कूल अशा विविध ठिकाणी झाले. नारायण यांच्या वडिलांची बदली महाराजा कॉलेज हायस्कूलमध्ये झाल्यानंतर ते मैसूर या ठिकाणी राहावयास गेले.

नारायण हे विद्यापीठ प्रवेश परीक्षेमध्ये अपयशी झाले व त्यांनी एक वर्ष घरीच वाचन आणि लिखाण केले. त्यानंतर त्यांनी १९२६ मध्ये विद्यापीठ प्रवेश परीक्षा पास केली व महाराजा कॉलेज ऑफ मैसूर जॉईन केले. नारायण यांना पदवी पूर्ण करण्यासाठी चार वर्षे लागली. यानंतर त्यांनी शाळा शिक्षकाची नोकरी केली. परंतु त्यांनी लगेचच ती नोकरी सोडली. लिखाणामधून त्यांना फारच कमी कमाई होत असे (पहिल्या वर्षी त्यांची वार्षिक कमाई ९ रुपये बारा आणे एवढी होती नारायण यांनी ‘स्वामी आणि मित्र ’ ही कादंबरी लिहिली. परंतु काकांनी त्यांच्या लिखाणावर टीका केली आणि बर्‍याच प्रकाशकांनी छापण्यास नकार दिला. याबरोबरच नारायण यांनी ‘मालगुडी’ या पुस्तकाचे लिखाण चालू केले. सुट्टीच्या काळामध्ये आपल्या बहिणीच्या घरी कोईमतूर या ठिकाणी असताना नारायण हे जवळच राहणार्‍या राजमा या १५ वर्षीय मुलीला भेटले व तिच्या प्रेमात पडले. बरेचसे अडथळे पार पडल्यानंतर नारायण यांनी त्या मुलीच्या वडिलांची लग्नासाठी परवानगी मिळवली व लग्न केले.

नारायण यांनी आपल्या सामी आणि फ्रेंड या कादंबरीचे हस्तलिखित ऑक्सफर्डमधील एका मित्राला पाठवले. या मित्राने ते हस्तलिखित ग्रॅहम ग्रीन यांना दाखवले. ग्रॅहम ग्रीनने ते लिखाण आपल्या प्रकाशकाला प्रकाशित करण्याची शिफारस केली आणि १९३५ साली ही कादंबरी प्रसिद्ध झाली. नारायण यांची दुसरी कादंबरी द बॅचलर ऑफ आर्टस् (१९३७) ही त्यांच्या महाविद्यालयीन अनुभवावर आधारित होती. १९३७ मध्ये नारायण यांच्या वडिलांचा मृत्यू झाला व नारायण यांची कमाई काहीच नसल्यामुळे त्यांना सक्तीने मैसूर सरकारकडून कमिशन घ्यावे लागले. नारायण यांनी सुरवातीच्या तीन कादंबरीमध्ये काही सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकला. पहिल्या पुस्तकामध्ये नारायण यांनी विद्यार्थीदशेवर व त्यांना वर्गामध्ये होणार्‍या शिक्षेवर प्रकाश टाकला. हिंदू विवाहामध्ये लग्नपत्रिका जुळण्याच्या प्रथेवर दुसर्‍या पुस्तकामध्ये प्रकाश टाकला. अशा या महान लेखकाचे १३ मे २००१ रोजी निधन झाले.

First Published on: May 13, 2021 3:15 AM
Exit mobile version