श्रेष्ठ सेनानी पहिले बाजीराव पेशवे

श्रेष्ठ सेनानी पहिले बाजीराव पेशवे

पहिले बाजीराव पेशवे यांचा आज स्मृतिदिन. बाजीराव हे मराठेशाहीतील एक श्रेष्ठ सेनानी. बाळाजी विश्वनाथ भट या पहिल्या पेशव्यांचा ज्येष्ठ मुलगा. आईचे नाव राधाबाई. बाजीरावांचे मूळ नाव विसाजी. बाजीराव बल्लाळ व थोरला बाजीराव या नावांनीही ते इतिहासात प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७00 रोजी झाला. बालपणी वडिलांच्या बरोबर स्वारी-शिकार्‍यांत राहिल्याने युद्धकलेचे व राजकारणाचे ज्ञान त्यांना लाभले. सय्यद बंधूंच्या मदतीस दिल्लीला गेलेल्या (1718) मराठी सैन्यातील एक तुकडी बाजीरावांच्या हाताखाली होती. छत्रपती शाहूंनी त्यांची कर्तबगारी ओळखून इतर ज्येष्ठ सरदारांच्या विरोधास न जुमानता १७ एप्रिल १७२0 रोजी त्यांना पेशवेपदाची वस्त्रे दिली.

पहिले बाजीराव पेशवे झाले त्या वेळी मराठी राज्याला चोहोबाजूंनी शत्रूंनी वेढले होते. दख्खनचा सुभेदार निजामुल्मुल्क १७२0 मध्ये दिल्ली सोडून दक्षिणेस कायमचे ठाण मांडून बसला होता. त्याचा बंदोबस्त करणे, त्याच्याकडून दख्खनच्या चौथ-सरदेशमुखीस संमती मिळविणे, हे पेशव्योचे पहिले काम होते. त्याशिवाय मिरज, अहमदनगरसारखी ठाणी मोगलांच्या ताब्यात होती. तसेच पश्चिमेकडील प्रदेश सिद्दी आणि पोर्तुगीज यांनी बळकावला होता. तो मुक्त करणे आवश्यक होते.

बाजीरावांची प्रारंभीची तीन-चार वर्षे खानदेश -बागलाण-कर्नाटक या भागांत स्वारी-शिकारीत गेली. पेशव्यांची फौज कर्नाटकात दूर गेली आहे, असे पाहून १७२७ मध्ये निजामाने कोल्हापूरच्या संभाजीशी संधान बांधले आणि छत्रपती शाहूंशी असा दावा मांडला की छत्रपतीपदाचा हक्क दोन्ही बंधूंनी निश्चित करावा, मगच चौथ-सरदेशमुखीसंबंधी धोरण ठरविण्यात येईल. शाहूंच्या छत्रपतीपदास सुरुंग लावून मराठी राज्यात फूट पाडण्याचा निजामाचा हा डाव उघड होता. बाजीरावांनी निजामाचा हा डाव धुडकावून युद्धाची तयारी केली.

1७२७ चा पावसाळा संपताच मोठ्या फौजेनिशी ते निजामाच्या मुलखावर चालून गेले. खानदेश, बर्‍हाणपूर, सुरत या भागांत चपळाईच्या मजला करून बाजीरावांनी निजामाचा तोफखाना निरुपयोगी केला आणि निजामाच्या सैन्याला बेजार केले. अखेर निजाम शरण आला. ६ मार्च १७२८ रोजी मुंगी-शेवगावच्या तहाने युद्धविराम झाला. शाहूंच्या छत्रपतीपदास निजामाने मान्यता दिली; कोल्हापुराच्या पातीशी संबंध सोडला आणि दख्खनच्या सहा सुभ्यांतून चौथ-सरदेशमुखीचे हक्क वसूल करण्यास मान्यता दिली.

बाजीरावांचे चरित्र व चारित्र्य रोमांचकारी घटनांनी भरले आहे. ते स्वभावाने तापट होते. सेनापतीस योग्य असे धैर्य व घाडस त्यांच्या अंगी होते. त्यांचे खासगी जीवन अत्यंत साधे, मराठी शिपाईगड्यास साजेसे होते. वयाच्या तेराव्या वर्षी महादजी कृष्ण जोशी यांच्या काशीबाई नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला (१७१३). त्यांना चार मुलगे झाले. त्यांपैकी नानासाहेब व रघुनाथराव हे पुढे प्रसिद्धीस आले. उत्तरेकडील स्वारीत त्यांचा मस्तानीशी संबंध आला (१७२९). बाजीरावांपासून मस्तानीस समशेर बहाद्दूर नावाचा मुलगा झाला. तो पुढे पानिपतच्या लढाईत (१७६१) कामी आला.

बाजीरावांनी मराठेशाहीची शान वाढविली. निजाम, सिद्दी, पोर्तुगीज यांसारख्या शत्रूंशी टक्कर देऊन मराठी राज्याचे आसन स्थिर कले आणि मराठी फौजांच्या पराक्रमाला नवी क्षितिजे निर्माण केली. अशा या श्रेष्ठ सेनानीचे २८ एप्रिल १७४0 रोजी निधन झाले.

First Published on: April 28, 2021 3:00 AM
Exit mobile version