शूरवीर देशभक्त शिरीषकुमार

शूरवीर देशभक्त शिरीषकुमार

शिरीषकुमार यांचा आज स्मृतिदिन. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनीच स्वातंत्र्यलढ्यात हिरीरीने भाग घेतला होता. १८५७ च्या उठावापासून ते स्वातंत्र्यापर्यंत अनेकांनी भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी अनेक आंदोलनं, चळवळी उभ्या केल्या. या आंदोलन, चळवळींना तत्कालीन जनतेने मोठा पाठिंबा दिला. महिला, पुरूष क्रांतिकारकांबरोबरच शाळकरी मुलांनीही भारताच्या स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले आहे. अशाच एका क्रांतिकारकाने भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिली. त्यांचे नाव शिरीषकुमार. महाराष्ट्रातील नंदूरबारचे ते सुपूत्र होते. त्यांचा जन्म २८ डिसेंबर १९२६ रोजी पुष्पेंद्र मेहता आणि सविता मेहता या दाम्पत्याच्या घरी शिरीषकुमार यांचा जन्म झाला. शिरीषकुमार यांचे आई-वडील दोघेही भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभागी होते. त्यांची आई सविताबेन ह्या राष्ट्र सेवा दल या स्थानिक संघटनेच्या अध्यक्षा होत्या. तर वडील पुष्पेंद्रभाई नंदूरबारमधील काँग्रेस कमिटीचे नेते होते. त्यामुळे देशप्रेमाचे वातावरण असलेल्या घरात शिरीषकुमार लहानाचे मोठे होत होते.

शिरीषकुमार यांना अरविंद, प्रफुल्ल आणि बकूळ हे तीन भाऊ तसेच शशिकला, सुवर्णा, मीरा आणि उषाबेन या चार बहिणी होत्या. शिरीषकुमार हे स्वयंपाकशास्त्रात निपुण होते. असेच एके दिवशी शिरीषकुमार चवदार पुर्‍या बनवत होते. पुर्‍या करत असताना अचानक कढईतील गरम तेल त्यांच्या पायावर पडले. पण शिरीषकुमार मात्र शांत होते. याबाबत त्यांच्या मित्राने त्यांना जखमेच्या वेदनेबाबत विचारपूस केली. तेव्हा त्यांनी मित्राला दिलेल्या उत्तरातून संवेदनशील आणि विचारशील शिरीषकुमारचे दर्शन घडले. ते मित्राला म्हणाले की, मला झालेल्या वेदनांपेक्षा ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीत भारतमातेला होणार्‍या वेदना अधिक क्लेशदायक असल्याचे मत त्यांनी मांडले होते. एके दिवशी शिरीषकुमार यांचे वडील पुष्पेंद्र मेहता यांना काही कामानिमित्त मुंबईला जावे लागले होते. साहजिकच मुंबईहून परतताना त्यांनी कुटुंबियांना कोणत्या भेटवस्तू पाहिजेत म्हणून विचारणा केली. त्यावेळी शाळेत जाणार्‍या शिरीषकुमारने वडिलांना महात्मा गांधीजींच्या प्रवचनांचे ऑडिओ रेकॉर्ड्स आणण्यास सांगितले. त्यानुसार पुष्पेंद्र मेहता यांनी ऑडिओ रेकॉर्ड्स आणले. त्यांनी पुढील अनेक दिवस गांधीजींच्या प्रवचनांचे ते रेकॉर्ड्स ऐकले. त्यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव पडला.

ब्रिटिशांनी ९ सप्टेंबर १९४२ रोजी महात्मा गांधींसह प्रमुख नेत्यांंना अटक केल्याला महिना पूर्ण झाला होता. भारतीय जनतेला ब्रिटिश राजवटीचा निषेध करण्यासाठी संपूर्ण दिवस संप करण्याचे आवाहन करण्यात येत होते. शिरीषकुमार आणि त्यांच्या साथीदारांच्या आवाहनाला जनतेचा भरघोस पाठिंबा मिळाला. लहानग्या शिरीषने केलेल्या आव्हानाने संतप्त झालेल्या पोलिसांनी शिरीषकुमारांवर तीन वेळा गोळीबार केला. शिरीषकुमार देशासाठी शहीद झाले. शिरीषकुमार यांच्या शौर्याची दखल घेत साने गुरूजींनी त्या घटनेत शहीद झालेले शिरीषकुमार, लालादास, धनसुखलाल, शशिधर आणि लहानगा घनश्याम यांच्या नावे शहीद स्तंभ उभारण्यास सांगितले. त्यानुसार शहिदांच्या गौरवार्थ नंदूरबारमध्ये स्मारक उभारण्यात आले.

First Published on: September 9, 2021 2:46 AM
Exit mobile version