…आणि गोवा मुक्त झाला

…आणि गोवा मुक्त झाला

1510 मध्ये पोर्तुगीजांनी गोव्याच्या भूमीवर पाय ठेवला तेव्हापासून गोमंतकीय जनतेचे जे वाईट दिवस सुरू झाले ते तब्बल साडेचारशे वर्षांनंतर 19 डिसेंबर 1961 रोजी संपले. दरवर्षी 19 डिसेंबर हा गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले असले तरी अनेक शतकांपासून गोव्यात पाय रोवून असलेले पोर्तुगीज मात्र हलायला तयार नव्हते. त्यासाठी भारतीय सैन्याला ताकदीने त्यांच्यावर आघात करावा लागला, तेव्हा त्यांनी भारतातून काढता पाय घेतला.

1961 च्या युद्धानंतर भारतभूमीवरील उरलेसुरले पोर्तुगीज अधिपत्य समाप्त झाले. तसेच गोवा, दमण व दीव हा प्रदेश संपूर्णपणे मुक्त झाला. या अर्थाने 1961 चे युद्ध हा गोवामुक्ती प्रक्रियेचा शेवटचा व अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा होता. हे मुक्तीयुद्ध म्हणजे गोवा मुक्ती आंदोलनाचा फक्त निर्णायक भाग होता. या युद्धाव्यतिरिक्त गोवा मुक्ती आंदोलनाचा खूप मोठा इतिहास आहे. ज्यामध्ये स्थानिक गोवेकर स्वातंत्र्यसैनिकांचा खूप मोठा वाटा आहे. भारतातील घडामोडी शांत झाल्यावर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी गोव्याला स्वतंत्र करण्यावर भर दिला.

पण गोव्याचे भारतात विलीनिकरण करण्याच्या बाजूने पोर्तुगीज नव्हते. नेहरुंनी भारत आणि पोर्तुगीज कॉलनीत चांगले संबंध राहण्याच्या दिशेने पावले उचलली. पण या कॉलन्यांमधील प्रशासक भारताला सहकार्य करीत नव्हते. अखेर नेहरुंनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून पोर्तुगीजांवर दबाव आणला. शांततेच्या मार्गाने भारत सोडून जाण्याचा संदेश दिला. त्याला पोर्तुगीज दाद देत नव्हते. वाटाघाटी यशस्वी होत नसल्याने पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी भारतीय लष्कराला कारवाईचे आदेश दिले.

पोर्तुगीज सरकारची ही जुलूमशाही आणि आंदोलनाला मिळणारा जनतेचा तीव्र प्रतिसाद या पार्श्वभूमीवर नेहरूंनी 17 डिसेंबर 1961 रोजी आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता भारतीय सैन्य गोव्यात घुसवण्याचा निर्णय घेतला. गोव्यातील जनतेने सैन्याचे स्वागत करून सर्वशक्तीनीशी सहकार्य केले.

अखेर 19 डिसेंबर 1961 रोजी गोव्यात भारताचा तिरंगा फडकला आणि गोवा मुक्त झाला. दीव आणि दमन आधीच मुक्त झाले होते. या तिघांना मिळून केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. नंतर 1967 साली सार्वमताने गोवा घटक राज्य म्हणून घोषित झाले. गोवा, दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशात 1963 साली निवडणूक झाली.

दोन्ही खासदार व बहुसंख्य आमदार महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे निवडून आले. पक्षाचे अध्यक्ष दयानंद बांदोडकर यांनी निवडणूक लढवली होती. बांदोडकर हे या प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री ठरले.

पणजी हे शहर गोव्याची राजधानी आहे. गोवा हे जगभरातील पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. इथे दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. आपले निसर्ग सौंदर्य आणि सुंदर बिचेससाठी गोवा प्रसिद्ध आहे.

First Published on: December 19, 2020 4:25 AM
Exit mobile version