रसाळ हापूससारखा देवगड

रसाळ हापूससारखा देवगड

देवगड

या झिम्म्यातील फळांचा राजा – कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील ’हापूस आंबा’ जगभर प्रसिद्ध आहे. रसरशीत हापूस आंब्याप्रमाणेच देवगड निसर्गसौंदर्यानेही नटलेला आहे. ९८ गावांचा मिळून देवगड तालुका बनला आहे. तालुक्याची आर्थिक मदार ही आंब्यांच्या बागांची लागवड, संवर्धन व विक्री यावर अवलंबून आहे. जवळजवळ पंचेचाळीस हजार हेक्टर जमीन ही हापूस आंब्यांच्या लागवडीखाली आहे.

अरबी समुद्राच्या तटावर वसलेले देवगड हे एक महत्वाचे बंदर आहे. देवगड किल्ल्यावर १९१५ साली खलाशांसाठी दीपस्तंभ उभारण्यात आला. संध्याकाळी ४ ते ५ च्या दरम्यान या दीपस्तंभाला भेट देऊ शकतो. किल्ल्यावर एक हनुमान मंदिरही आहे. राजा भोज दुसरा या शिलाहार राजाने देवगडमध्ये घेरिया किल्ला बांधला. पूर्वी या किल्ल्याचा विस्तार ५ एकर होता. तेव्हा हा चारी बाजूंनी समुद्राने वेढलेला होता. शिलाहारांनंतर विजापूरच्या आदिल शहाने हा किल्ला जिंकला. १६५३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी घेरिया किल्ला जिंकला.हल्लीच्या काळात विजयदुर्गच्या भोवती समुद्रात ३ मीटर उंचीची व १०० मीटर लांबीची भिंत आढळली आहे. ही समुद्राखालील भिंत शिवाजी महाराजांच्या किल्ले बांधणीच्या कौशल्याची साक्ष देत आहे.

कुणकेश्वर हे समुद्रकिनारी वसलेले पुरातन शिवमंदिरही पर्यटकांसाठी आकर्षण आहे. कुणकेश्वर मंदिराची उभारणी मुस्लीम व्यापार्‍याने केली असे मानले जाते. आताचे मंदिर हे नव्याने डागडुजी केलेले आहे. मंदिर परिसरात या व्यापार्‍याची कबरदेखील आहे. महाराष्ट्रातील पहिला पवनचक्की प्रकल्प गिर्ये येथे उभारण्यात आला आहे. तेथून ३ किमी अंतरावर १६ व्या शतकातील श्री देव रामेश्वर मंदिर आहे. मुणगे गावी देवी भगवतीचे मंदिर आहे. जामसंडे येथे दिर्बादेवीचे मंदिर आहे. समुद्रकिनार्‍यांची साथ तारकर्लीप्रमाणेच येथेही राहते. निसर्गाची शांतता अनुभवायची असेल तर देवगड उत्तम पर्याय आहे.


-तृप्ती परब

First Published on: July 17, 2018 7:05 AM
Exit mobile version