प्रसिद्धरामय्या की सिद्धरामय्या?

प्रसिद्धरामय्या की सिद्धरामय्या?

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया

सुप्रीम कोर्टाने अखेरीस आमचेच म्हणणे मान्य केले म्हणायचे. गेले दोन दिवस, म्हणजे राज्यपालांनी भाजपाच्या येडीयुरप्पांना मुख्यमंत्री म्हणून सत्तास्थापनेचे आमंत्रण दिल्यापासून आम्ही एक भूमिका ठामपणे मांडलेली होती, की राज्यपालांचा निर्णय कोणीही बदलू शकत नाही. त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. घटनेने मुख्यमंत्री निवडीचा अधिकार राज्यपालांना दिलेला आहे. पण मुख्यमंत्र्यांपाशी असलेले बहुमत तपासणे वा सिद्ध करण्याचे काम राज्यपालांचे नाही. म्हणूनच त्यात कोर्ट कुठला हस्तक्षेप करू शकत नाही. मात्र नव्या मुख्यमंत्र्याला बहुमत सिद्ध करण्यासाठी दिलेल्या अवधीत कोर्ट काटछाट करू शकते. झालेही तसेच. कोर्टाने १५ दिवसांची मुदत छाटून शनिवारीच म्हणजे तीन दिवसांतच बहुमत सिद्ध करण्याचे बंधन येडीयुरप्पा यांना घातले. म्हणूनच शपथविधी रोखण्यासाठी वा राज्यपालांचा निर्णय बदलण्यासाठी काँग्रेसने केलेला द्राविडी प्राणायाम शुद्ध मूर्खपणा होता. त्यासाठी मध्यरात्री जाऊन सुप्रीम कोर्टाला जागरण घडवणे हा शतमूर्खपणा होता. मुदत घटवण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळीही कोर्टात जाता आले असते. मध्यरात्रीचा तमाशा करण्याची गरज नव्हती. त्यापेक्षा कुठलाही वेगळा निर्णय आलेला नाही. मग काँग्रेसला आपला विजय कुठून व कशामध्ये दिसतो आहे? मग हा सगळा आटापिटा कशासाठी, हा प्रश्न शिल्लक उरतो. काँग्रेसची जाहीर भूमिका व बढाया खèया असतील, तर त्यांना तितके घायकुतीला येण्याची गरज नव्हती. पण तशी तारांबळ काँग्रेसची उडालेली आहे आणि त्याचे खरे कारण आपल्याच आमदारांवर काँग्रेस जनता दलाचा विश्वास नसावा. त्यातले किती दगाबाज आहेत आणि किती शत्रूपक्षाला मिळालेले आहेत, त्याची भिती काँग्रेसला भयभीत करत असावी. यातला खरा घातपाती काँग्रेसमध्ये कोण आहे? येडीयुरप्पा बहुमत सिद्ध(रामय्या) करणार काय?

पुन्हा निवडणुका झाल्या  तरी सिद्धरामय्यांना महत्वाचे पद नाही 
शनिवारी बहुमत सिद्ध करण्याची छातीठोक ग्वाही देताना भाजपा पलिकडे आपले ११ समर्थक आमदार असल्याचे सांगतो आहे. हे आमदार काँग्रेसचे असावेत असे मानले जाते. त्या आमदारांना थेट भाजपाचा कोणी भेटल्याचे वृत्त नाही की अफवाही नाही. मग भाजपाचा आत्मविश्वास कुठून आलेला असू शकतो? कोणीतरी काँग्रेस जनता दलाच्या गोटात असा बसलेला आहे, की जो तिथे बसून भाजपाच्या गरजेनुसार सूत्रे हलवित असावा. असा कोण असू शकतो? या निकालात सर्वाधिक महत्त्व गमावणारा माणूस आहे सिद्धरामय्या! त्यांनी आपले बहुमतच नव्हेतर सत्ताही गमावलेली आहे. काँग्रेसची सत्ता नव्हे तर सिद्धरामय्यांचे मुख्यमंत्रिपद संपुष्टात आलेले आहे. पुन्हा निवडणुका झाल्या तरी त्यात सिद्धरामय्यांना कुठले इतके महत्वाचे पद मिळण्याची शक्यता संपलेली आहे. अशा स्थितीत पक्षासाठी त्यांनी निकालापूर्वीच मुख्यमंत्रिपद सोडायची तयारी दर्शवली होती आणि दलित नेत्याला ते पद देण्याची इच्छा व्यक्त केलेली होती. जे आपल्याला मिळणारच नाही, ते अन्य कोणालाही देण्याची तयारी त्यागाचा दाखला नसतो. थोडक्यात मतमोजणीपूर्वीच सिद्धरामय्यांनी सत्ता गमावलेली होती आणि जे आपल्याला मिळणारच नाही, ते अन्य कुणालाही मिळाले, म्हणून त्यांना फरक पडत नाही. पण जे गमावले आहे, ते आपल्या कट्टर शत्रूला मिळू नये, इतकी तर त्यांची अपेक्षा असेल ना? सिद्धरामय्यांचा कट्टर शत्रू येडीयुरप्पा असतील, तर त्यांची संधी हुकण्यासारखे समाधान दुसरे असू शकत नाही. पण येडींपेक्षा अधिक मोठा कोणी शत्रू असेल, तर त्याचे नुकसान महत्वाचे ठरते आणि तसा शत्रू येडींपेक्षा कुमारस्वामी आहे. कारण याच देवेगौडापुत्रामुळे सिद्धरामय्यांना २००५ सालात आपले उपमुख्यमंत्रिपद गमवावे लागलेले होते. थोडक्यात येडींपेक्षा मोठा शत्रू कुमारस्वामी आहे आणि त्याचा विचका हा पराभूत सिद्धरामय्यांसाठी अपयशातला विजय ठरू शकतो.

भाजपा आणि जनता दलाला मुख्यमंत्रीपद देण्याचा झालेला सौदा 
सिद्धरामय्या मूळचे जनता दलाचे नेते. काँग्रेसने सत्ता गमावली तेव्हा भाजपा सर्वात मोठा पक्ष होता आणि त्याला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी देवेगौडांनी काँग्रेस पक्षाला पाठींबा देऊन कर्नाटकात संयुक्त सरकार स्थापन केलेले होते. त्यात काँग्रेसचे धर्मसिंग मुख्यमंत्री तर जनता दलाचे सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री झालेले होते. ते सरकार पाडण्याचे डावपेच कुमारस्वामी खेळले व त्यांनी जनता दलाच्या आमदारांना सरकारमधून बाहेर पडायला लावले. मग उरलेल्या ४० महिन्यांत २०-२० महिने भाजपा व जनता दलाला मुख्यमंत्रीपद देण्याचा सौदा झालेला होता. त्यात कुमारस्वामी प्रथम मुख्यमंत्री झाले, तर येडीयुरप्पा उपमुख्यमंत्री झाले. त्या गडबडीत सिद्धरामय्यांचे उपमुख्यमंत्रीपद गेले. पुत्रप्रेमाने गप्प राहिलेल्या देवेगौडांना झुगारून मग सिद्धरामय्यांनी काँग्रेसमध्ये आश्रय घेतला. सात वर्षे ते वनवासात गेले आणि अखेरीस २०१३ सालात काँग्रेसचे नेतृत्व करीत मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्यांना सात वर्षे वनवासात पाठवणारे येडी नव्हते, तर कुमारस्वामी होते. अशा दगाबाजाला आपल्याच त्यागातून पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हायला हातभार लावणे, कोणाला आवडू शकते? सिद्धरामय्यांची मानसिक स्थिती आज काय असू शकते? येडीयुरप्पा सत्तेच्या बाहेर बसणे त्यांना सुखदायक वाटेल, की कमी आमदार असून कुमारस्वामी मुख्यमंत्रिपदी बसणे समाधान देऊ शकेल? ही दुखरी बाजू लक्षात घेतली, तर पहिल्याच दिवसापासून काँग्रेसमधले दहाबारा आमदार नाराज कशासाठी आहेत वा कुमारस्वामींच्या विरोधात कशाला आहेत, त्याचा उलगडा होऊ शकतो. काँग्रेसच्या आमदारांमध्ये सहभागी राहून जे काम भाजपासाठी सिद्धरामय्या करू शकतात, असा दुसरा कोणी भाजपाचा हस्तक असू शकत नाही. आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे आपल्याच माजी मुख्यमंत्र्यावर काँग्रेस गोटात कोणी शंकाही घेऊ शकत नाही ना?

कुछ तो गडबड है भाई !
निकालाचे चित्र स्पष्ट झालेले नव्हते आणि सगळे आकडे साफ समोर आलेले नव्हते, इतक्यात काँग्रेसश्रेष्ठींनी परस्पर जनता दलाला म्हणजे कुमारस्वामींना मुख्यमंत्री करायला पाठींबा जाहीर केला. त्यात सिद्धरामय्यांचा परस्पर बळी दिला गेलेला आहे. पण तेव्हाच काँग्रेस आमदार नाराज असल्याच्या बातम्या सुरू झालेल्या होत्या. त्याचा बोलविता धनी कोण असू शकतो? कोणीतरी काँग्रेस गोटात बसलेलाच तशी सूत्रे हलवू शकतो ना? काँग्रेसचे काही आमदार गायब होणे, एका हॉटेलात जमवून ठेवलेल्यांपैकी दोन आमदार निसटणे. या गोष्टी तर्कापलिकडल्या आहेत. कुछ तो गडबड है भाई! भाजपाने काँग्रेस जनता दलाच्या कुठल्याही आमदारांना फोडण्याचा वा संपर्क साधण्याचा प्रयास केल्याची एकही भक्कम बातमी नाही. मग काँग्रेसच्या तंबूतली घबराट आतला कोणी घरभेदी असल्याचीच ग्वाही देणारी आहे. सध्यातरी दुसरा कोणी शंकास्पद माणूस दिसत नाही. डझनभर नवोदित आमदार कुमारस्वामी विरोधात कशाला असू शकतात? त्यांच्यावर या गौडापुत्राने कुठला अन्याय केलेला नाही. मग इतक्या घाऊक संख्येने आमदारांची नाराजी कोणा ज्येष्ठ काँग्रेस नेत्याची नाराजी असू शकते आणि असाही एकच काँग्रेसचा प्रभावी नेता आहे. भाजपाच्या बहुमताचा सगळा डोलारा त्याच्याच खांद्यावर पेललेला असू शकतो. म्हणूनच प्रसिद्ध-रामय्या आणि सिद्ध-रामय्या असे दोन चेहरे आहेत. त्यात कॅमेरासमोर येणारा प्रसिद्धरामय्या किती खरा आहे, ते येडींचे बहुमत फसले तर दिसेलच. पण येडींनी बहुमत सिद्ध केले तर त्याचा मानकरी वास्तवात (सिद्ध)रामय्याच असू शकतो. यातला कुठला चेहरा विश्वासार्ह आहे आणि कुठला भ्रामक मायावी आहे, त्याचा खुलासा शनिवारी बहुमताचा निर्णय समोर आल्यावरच होऊ शकेल. तोपर्यंत टीव्हीच्या पडद्यावर दिसणारा सिद्धरामय्या निरखून अभ्यासण्याची गरज आहे.

First Published on: May 19, 2018 5:55 AM
Exit mobile version