ऐतिहासिक कादंबरीकार नाथमाधव

ऐतिहासिक कादंबरीकार नाथमाधव

नाथमाधव हे लोकप्रिय मराठी कादंबरीकार होते. त्यांचे खरे नाव द्वारकानाथ माधव पितळे. त्यांचा जन्म ३ एप्रिल १८८२ रोजी मुंबईत झाला. शालेय जीवनात एक क्रीडानिपुण विद्यार्थी म्हणून ते चमकले तथापि पुस्तकी शिक्षणाकडे त्यांचा फारसा ओढा नसल्यामुळे मॅट्रिकच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी कुलाबा येथील ‘गन कॅरिज फॅक्टरी’ मध्ये नोकरी धरली. त्या निमित्ताने पुष्कळ प्रवास केला. ह्याच काळात त्यांना शिकारीचा छंद जडला. अशाच एका शिकारीच्या प्रसंगी एका उंच कड्यावरून ते खाली कोसळले आणि त्यांच्या कमरेखालील भाग लुळा झाला (१९०५). उपचारार्थ इस्पितळात असताना त्यांना वाचनाची आवड उत्पन्न झाली आणि अनेक इंग्रजी-मराठी ग्रंथांचे त्यांनी वाचन केले. त्यातूनच लेखन करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. सुरुवातीला त्यांनी काही इंग्रजी लेख लिहिले आणि पुण्याच्या डेक्कन हेरल्ड या वृत्तपत्रातून ते प्रसिद्धही झाले. पुढे धूतपापेश्वर आरोग्य मंदिराकडून देशी औषधोपचार करून घेण्यासाठी ते पनवेल येथे गेले असता तेथे प्रबोधनकार ठाकरे आणि केरळकोकिळकार कृ. ना. आठल्ये यांचा सहवास त्यांना लाभला.

पनवेल येथेच त्यांनी कथा-कादंबर्‍या लिहिण्यास सुरुवात केली. ‘प्रेमवेडा’ ही त्यांची पहिली कादंबरी १९०८ मध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर सामाजिक आणि ऐतिहासिक मिळून तिसांहून अधिक कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या. नाथमाधवांनी आपल्या सामाजिक कादंबर्‍यांतून काही प्रश्नांची चर्चा बोधवादाच्या अंगाने करण्याचा प्रयत्न केला. अशा कादंबर्‍यांपैकी डॉक्टर (३ भाग, १९१८-२०) ही त्यांची विशेष लोकप्रिय अशी कादंबरी. या कादंबरीवर एक मराठी चित्रपटही काढण्यात आला होता. या कादंबरीखेरीज हेमचंद्र रोहिणी (१९०९), रायक्लब अथवा सोनेरी टोळी, देशमुखवाडी (१९१६), विमलेची ग्रहदशा (१९१७) अशा अन्य काही सामाजिक कादंबर्‍याही त्यांनी लिहिल्या. त्यांतून स्त्रियांच्या व्यथा, घरातून मिळणारे शिक्षण आणि सुसंस्कार यांचे महत्त्व, समाजातील कृष्णकृत्ये असे काही विषय त्यांनी तळमळीने हाताळले. तथापि त्यांच्या ऐतिहासिक कादंबर्‍यांनी-विशेषतः हिंदवी स्वराज्यविषयक कादंबर्‍यांनी-कादंबरीकार म्हणून त्यांचा लौकिक विशेष वाढविला. सावळ्या तांडेल (१९०९) ही त्यांची पहिली ऐतिहासिक कादंबरी.

शिवाजी महाराजांचे सामर्थ्यशाली आरमार आणि ते राखणारे शूर तांडेल हा विषय मराठी ऐतिहासिक कादंबरीला नवा होता. त्यामुळे शिवकालीन इतिहासातील एका वेगळ्याच विषयावर कादंबरी लिहिण्याचे श्रेय त्यांना मिळाले. स्वराज्याचा श्रीगणेशा (१९२१), स्वराज्याची स्थापना (१९२२), स्वराज्याची घटना (१९२५), स्वराज्याचा कारभार (१९२३), स्वराज्यावरील संकट (१९२३), स्वराज्याचे परिवर्तन (१९२५) आणि स्वराज्यातील दुफळी (१९२८) या कादंबरीमालेतून त्यांनी मराठेशाहीच्या उदयापासूनचा कालखंड चित्रित केला. नाथमाधवांना अद्भुताचे मोठे आकर्षण होते. वीरधवल (१९१३) या कादंबरीत त्याचा विशेषत्वाने प्रत्यय येतो. त्यांच्या अनेक कादंबर्‍यांप्रमाणे ह्या कादंबरीसही मोठी लोकप्रियता लाभलेली होती. त्यांनी लिहिलेली हेमचंद्र रोहिणी ही राजकीय विषयांवरील आरंभीच्या मराठी कादंबर्‍यांपैकी एक होय. त्यांनी काही नाटके व कविताही लिहिल्या आहेत. अशा या महान ऐतिहासिक कादंबरीकाराचे मुंबई येथे २१ जून १९२८ रोजी निधन झाले.

First Published on: April 3, 2021 3:30 AM
Exit mobile version