इतिहास संशोधक दत्तो वामन पोतदार

इतिहास संशोधक दत्तो वामन पोतदार

दत्तो वामन पोतदार हे थोर इतिहास संशोधक, मराठी लेखक आणि शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासक होते. त्यांचा जन्म कुलाबा जिल्ह्यातील बिरवाडी ह्या गावी ५ ऑगस्ट १८९० रोजी झाला. पोतदारांच्या घराण्याचे मूळ उपनाव ओर्पे असे होते. तथापि आदिलशाहीत त्यांचे एक पूर्वज पोतदार किंवा खजिन्याचे अधिकारी नेमले गेले. तेव्हापासून ओर्पे हे उपनाव मागे पडले आणि पोतदार हे रूढ झाले. पोतदारांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात झाले. १९०६ मध्ये ते मॅट्रिक झाले. १९१० मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून ते बी.ए. झाले. त्यानंतर त्यांनी न्यू पूना कॉलेजात (पुढे ह्याचेच सर परशुरामभाऊ कॉलेज असे नामांतर झाले) इतिहास आणि मराठी ह्या विषयांचे अध्यापन केले.

नूतन मराठी विद्यालय मराठी शाळेचे व नूतन मराठी विद्यालयाचे अधीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांनी केलेल्या अव्याहत विद्याव्यासंगामुळे त्यांना पुढील पदव्या प्राप्त झाल्या: केंद्र शासनाने ‘महामहोपाध्याय’ ही पदवी दिली (१९४८). हिंदी साहित्यसंमेलनाने त्यांना ‘साहित्यवाचस्पति’ ही उपाधी प्रदान केली. वाराणसेय विश्वविद्यापीठ व पुणे विद्यापीठ यांनी डी.लिट्. पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. केंद्र शासनाने ठरविलेल्या पंडितांपैकी ते एक होते. १९१५ साली ते पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळी ह्या संस्थेचे आजीव सदस्य झाले. १९३३ते १९३६ह्या काळात ते महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे संपादक होते. १९४६ ते १९५० ह्या काळात ते पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या अध्यक्षपदी होते. १९३९ मध्ये अहमदनगर येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष, तसेच १९४३ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष होते. १९४६ते १९५० ह्या काळात संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.

प्राचीन मराठी साहित्य आणि मराठ्यांचा इतिहास ह्या विषयांचा त्यांचा विशेष व्यासंग होता. तत्संबंधी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या नियतकालिकांत आणि अन्यत्रही त्यांनी बरेच स्फुट लेखन केले आहे. मराठी गद्याचा इंग्रजी अवतार (१९२२) हा त्यांचा ग्रंथ अव्वल इंग्रजीच्या कालखंडातील (१८१०- ७४) मराठी साहित्येतिहास लिहिण्याचा प्रारंभीचा प्रयत्न म्हणून उल्लेखनीय आहे. ह्या कालखंडातील मराठी गद्याच्या जडणघडणीचे सप्रमाण दर्शन या ग्रंथात घडविण्यात आले आहे. महाराष्ट्र-साहित्यपरिषद्-इतिहास, वृत्तविभाग व साधन विभाग (१९४३) ह्या त्यांच्या पुस्तकात मराठी साहित्यिकांचे प्रतिनिधित्व करणार्‍या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आरंभीच्या कालखंडातील कार्याची माहिती आहे.

पोतदार हे एक उत्तम वक्तेही होते. मराठीप्रमाणेच इंग्रजी, हिंदी व संस्कृत या भाषांतही ते प्रभावीपणे भाषणे करू शकत. त्यांनी दिलेली काही व्याख्याने श्रोतेहो ह्या नावाच्या पुस्तकात संग्रहीत आहेत. निरनिराळ्या निमित्ताने भारतात, तसेच परदेशांतही त्यांनी प्रवास केला होता. त्यांच्या व्यासंगाच्या मानाने त्यांची ग्रंथरचना संख्येने कमी आहे तथापि त्यांनी केलेल्या लेखनामुळे व संस्थासंचालनामुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन समृद्ध झाले आहे. ते अविवाहित होते. पुणे येथे ६ऑक्टोबर १९७९ त्यांचे निधन झाले.

First Published on: August 5, 2021 3:15 AM
Exit mobile version