जनस्वी लोकशाहीर अमर शेख

जनस्वी लोकशाहीर अमर शेख

शाहीर अमर शेख हे ख्यातनाम मराठी लोकशाहीर होते. मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचे मूळ नाव. आईचे नाव मुनेरबी. त्यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1916 रोजी बार्शी येथे झाला. गरीब मुसलमान कुटुंबात जन्मलेल्या अमर शेख यांना विलक्षण पल्लेदार, पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता. गरिबीमुळे कधी बसचालकाबरोबर क्लीनर म्हणून, तर कधी गिरणी कामगार म्हणून त्यांना काम करावे लागले. गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरुंंगातही जावे लागले. तेथे भेटलेल्या कॉम्रेड रघुनाथ कर्‍हाडकर यांच्या प्रभावामुळे ते कम्युनिस्ट झाले. पोलिसांचा ससेमिरा चुकवत ते कोल्हापूरला आले व मास्टर विनायकांच्या स्टुडिओत काम करू लागले. येथेच त्यांच्या मित्रांनी ‘अमर शेख’ असे नामकरण केले. राष्ट्रीय चळवळीत ते १९३०-३२ च्या सुमारास सामील झाले.

आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला. स्वरचित आणि इतरांचीही कवने ते प्रभावीपणे पेश करीत. गोवामुक्ती आंदोलनातही त्यांनी मोठे योगदान दिले. चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रुपयांचा निधी देशासाठी गोळा केला. उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी, लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये इत्यादींचा समावेश होता. जनसमुदायाला भारून टाकण्याचे प्रभावी अंगभूत कौशल्य त्यांच्याजवळ होते. त्यांची लेखणी जिवंत, ज्वलंत आणि हृदये प्रदीप्त करणारी होती. कवितेची अंतर्लय व रचना यमक प्रचुर करण्याची अमर शेख यांची प्रवृत्ती होती. रौद्र रसाचा आविष्कारही त्यांच्या काही कवनांतून त्यांनी घडविला. त्यांच्या बर्‍याचशा रचना प्रासंगिक असल्या, तरी त्यांत विचारभावनांचे थरारते चैतन्य जाणवते. ते नुसतेच मनस्वी कवी नव्हते, तर जनस्वी लोकशाहीर होते. त्यांची कविता जनतेच्या ओठांवर रूजली, फुलली आणि ती लोकगंगेने जगविली. कविता हा या लोकशाहिराचा बहि:श्चर प्राण होता आणि सामान्यांतल्या सामान्याचे उत्थान हा त्यांच्या आत्म्याचा आवाज होता.

कलश (१९५८) आणि धरतीमाता (१९६३) हे त्यांचे काव्यसंग्रह, अमरगीत (१९५१) हा गीतसंग्रह आणि पहिला बळी (१९५१) हे त्यांनी लिहिलेले नाटक. त्यांनी रचलेल्या पोवाड्यांत छत्रपती शिवाजी महाराज, होळकर आणि उधमसिंग यांच्या पोवाड्यांचा समावेश आहे. युगदीप व वख्त की आवाज या मासिकांचे त्यांनी संपादन केले. प्रपंच आणि महात्मा जोतिबा फुले या चित्रपटांतून आणि झगडा या नाटकातून त्यांनी प्रभावी आणि ढंगदार भूमिका केल्या. लोककलांचे जतन, संवर्धन व संशोधन व्हावे तसेच शाहिरी व लोककलेचा वारसा वृद्घिंगत व्हावा या उद्देशाने मुंबई विद्यापीठात 2007 मध्ये त्यांच्या सन्मानार्थ ‘शाहीर अमर शेख’ अध्यासन सुरू करण्यात आले आहे. अशा या लोकप्रिय शाहिराचे २९ ऑगस्ट १९६९ रोजी निधन झाले.

First Published on: October 20, 2021 2:54 AM
Exit mobile version