नटश्रेष्ट नानासाहेब फाटक यांना अभिवादन

नटश्रेष्ट नानासाहेब फाटक यांना अभिवादन

जगावे की मरावे असा प्रश्न विचारताना शेक्सपिअरच्या हेम्लेटलाही अंचबित करेल, असा अप्पासाहेब बेलवलकर ज्यांनी मराठी रंगभूमीवर जिवंत केला, त्या नानासाहेब फाटकांचा २४ जून १८९९ साली कोल्हापूर येथे जन्म झाला गोपाळ गोविंद फाटक हे त्यांचे मूळ नाव. मात्र, या नावापेक्षा त्यांचे नानासाहेब फाटक हेच नाव लोकांच्या तोंडी जास्त झाले. मराठी रंगभूमीवरील त्यांचे नटसम्राट हे नाटक एवढे गाजले की त्यापुढे त्यांच्यामागे कायमच नटसम्राट ही उपाधीच लावली गेली.
रुबाबदार व्यक्तिमत्व, ऐटबाज चाल, धगधगते पुरुषी सौंदर्य आणि मनाचा ठाव घेणारी तीक्ष्ण नजर यांच्या जोडीला सप्तकातून भिरभिरणारा आवाज लाभलेल्या नानासाहेबांनी पद्यातील संगीताच्या तोडीसतोड गद्यातले संगीत उभे केले.

रक्षाबंधन या नाटकातून त्यांनी नाट्यक्षेत्रात प्रवेश केला. रक्षाबंधनमधली त्यांची गिरीधराची भूमिका चांगलीच गाजली. त्यानंतर त्यांना प्रमुख नायक आणि खलनायक म्हणून अनेक भूमिका मिळाल्या. नानासाहेब फाटक हे वास्तविक रंगमंचावरचे कलाकार. पण ‘थोरातांची कमळा’ चित्रपटातील त्यांचा शिवाजी न भूतो न भविष्यति ठरला. पुण्यप्रभाव, ‘श्री’,‘सोन्याचा कळस’,‘राक्षसी महत्वाकांक्षा’ या नाटकांतील देखील नानासाहेबांच्या भूमिका विशेष ठरल्या. ‘श्री’ या नाटकामध्ये त्यांनी कुसुमाकराची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका कमालीची लोकप्रिय ठरली.‘सोन्याचा कळस’ या नाटकात त्यांनी केलेली बाबा शिवगणची भूमिकाही नाट्यप्रेमींना आवडली होती. ‘राक्षसी महत्वाकांक्षा’ त्यांनी केलेली विक्रांतची भूमिका अजरामर ठरली होती. आपल्या या अप्रतिम भूमिकांमुळेच त्यांच्या काळात नानासाहेब नाट्यसृष्टीचे अनशिषिक्त नटसम्राट झाले होते.

‘बेबंदशाही’ तला संभाजी मधुसूधन कोल्हटकर यांनी नानासाहेब फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली साकारला. त्यांनी सादर केलेला ‘एकच प्याला’मधला सुधाकर लोकप्रिय ठरला. शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’ नाटकातील त्यांनी सादर केलेली हॅम्लेटची भूमिका नाट्यप्रेमी विसरूच शकत नाहीत. त्यांनी ‘पुण्यप्रभाव’मध्ये साकारलेला वृंदावनही सर्वांच्या लक्षात राहिला. मराठी रंगभूमीवर फार थोड्या नटांना खलनायकांच्या भूमिका करून यश, कीर्ती आणि संपत्ती यांचा लाभ झाला. अशा थोड्या नटांत नानासाहेबांची गणना प्रामुख्याने होते. जाहिरातीत नटवर्य नानासाहेब फाटक हे नाव वाचले की, प्रेक्षक नाट्यगृहात तोबा गर्दी करीत असत. धिप्पाड आणि बांधेसूद तसेच रेखीव आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख. त्यांनी रंगमंचावर पाऊल टाकले की, सारा रंगमंच भरून गेला असे वाटत असे. देहयष्टी दृष्ट लागण्यासारखी. नटाला जो ‘डोळा’ लागतो तो नानासाहेबांपाशी होता. आवाज तिन्ही सप्तकांत लीलया फिरणारा. हालचाली कमालीच्या ग्रेसफुल. आवाज पल्लेदार असल्याने कितीही मोठे वाक्य ते अगदी विनासायास, सहजगत्या आणि लीलया फेकीत. त्यांनी केलेल्या सर्व भूमिका ही कुणाचीही नक्कल न करता स्वत:च्या पद्धतीने, विचारपूर्वक केल्या होत्या.

नटाने जीवनातील विविध अनुभव घ्यावेत. अनेक गोष्टी पाहाव्यात, कराव्यात, भोगाव्यात असे त्यांचे मत होते. त्यांना वाटे की, अनुभवाने समृद्ध असे जीवन जर नटाचे नसेल तर त्याला विविध भूमिकांचा आविष्कार उत्तम प्रकारे करता येणार नाही. विद्यार्थीदशेतली नानासाहेबांची काकासाहेब खाडिलकरांच्या ‘सत्त्वपरीक्षा’ या नाटकातली विश्वादमित्राची भूमिका खूप गाजली. पण, त्यांना खरी प्रसिद्धी आणि लोकप्रियता लाभली ती ‘रक्षाबंधन’ या नाटकातील ‘गिरीधर’च्या भूमिकेने. या भूमिकेने त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. हा सुशिक्षित आणि देखणा नट आपल्याकडे असावा असे गुणग्राहक केशवराव भोसल्यांना वाटले आणि त्यांनी नानासाहेबांना ललितकलेत बोलावले. या नाटक मंडळीत नानासाहेबांचा प्रवेश झाला आणि त्यांच्यातील नाट्यगुणांना वाव मिळेल अशा विविधांगी भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या.

‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ या नाटकातील वीरश्रीयुक्त विक्रांतची भूमिका, ‘संन्याशाचा संसार’मधील शंकराचार्यांची भूमिका,‘सत्तेचे गुलाम’मधील केरोपंत वकिलाची भूमिका,‘शहाशिवाजी’ नाटकात शहाजी,‘कृष्णार्जुन युद्धात’ चित्ररथ गंधर्व,‘हाच मुलाचा बाप’मध्ये वसंत,‘श्री’ या नाटकातील कुसुमाकर, ‘सोन्याचा कळस’ नाटकातील कामगार बाबा शिगवण इ. भूमिका तर खूपच गाजल्या, पण ‘पुण्यप्रभाव’मधील वृंदावन, ‘एकच प्याला’मधील सुधाकर, ‘झुंजारराव’ नाटकातील झुंजारराव आणि ‘हॅम्लेट’ या भूमिका त्यांच्या सर्वोच्च भूमिका आहेत. केंद्र सरकारने सर्वश्रेष्ठ नट म्हणून नानासाहेबांना गौरवचिन्ह अर्पण केले होते. त्यांच्याइतका भव्य, रुबाबदार, देखणा आणि ग्रेसफुल नट आजतागायत दुसरा कुणी झाला नाही. नानासाहेब फाटक यांचे ८ एप्रिल १९७४ रोजी निधन झाले. त्यांना भावपूर्ण आदरांजली.

First Published on: June 23, 2020 6:07 PM
Exit mobile version