आठवणींची साठवण

आठवणींची साठवण

आठवणींची साठवण

आठवण अशी गोष्ट आहे जी आपल्या घरातील तिजोरीत ठेवलेल्या धनसंपत्तीपेक्षा जास्त मोलाची असतेे. एकवेळ आपल्या तिजोरीतली संपत्ती कमी होईल. मात्र आठवणींची संपत्ती कधीच कमी होणार नाही. ती कायमस्वरुपी आपल्यासोबत राहते. एखाद्या प्रसंगी या आठवणींमुळेच आपल्या चेहर्‍यावर हास्य उमटतं तर कधी डोळ्यांतून आसू येतात. आठवणी या फक्त चांगल्याच असतात असं नाही तर काही कटू आठवणीही असतात. या कटू आठवणींना जेव्हा उजाळा मिळतो त्यावेळेस त्या आपल्या काही गोष्टींची जाणीव करून देत असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात निरनिराळ्या प्रसंगांच्या आठवणी असतात. आपल्याला उचकी लागली आणि जर ती पाणी पिऊनही नाही थांबली की म्हणतात कोणीतरी जवळची व्यक्ती तुमची आठवण काढत आहे. अशावेळी आपल्या प्रिय व्यक्तीचं नाव घेतलं तर लगेच उचकी थांबते. माझ्या मते प्रिय व्यक्ती म्हणजे फक्त प्रेयसी किंवा बायकोचं नाव घेतलं पाहिजे असं काही नाही. कधी कधी आई-वडील, भाऊ-बहीण किंवा एखाद्या मित्राचं नाव घेतल्यावरही उचकी थांबते.

खरंतर आठवणींचं गाठोडं बांधायला अगदी लहानपणापासूनच सुरूवात होते. बालपणापासून तारूण्यापर्यंतच्या आठवणी खूपच सुखद असतात. आईवडिलांचं बोट धरून टाकलेलं पहिलं पाऊल. हे कोणत्याही लहान मुलाच्या लक्षात राहत नाही. मात्र थोडेफार समजायला लागल्यावर आपले पालकच हसत गंमत म्हणून त्या आठवणींना उजाळा देतात. तर कधीकधी ह्या आठवणी फोटोरुपी सोबत असतात. थोडेफार मोठे झाल्यानंतर शालेय जीवनात आईचा पदर धरत, ढसाढसा रडत शाळेत न जाण्याचा हट्ट करायचा तर कधी पोटात दुखतंय असं खोटं नाटक करायचं. कधी शाळेत खाल्लेला शिक्षकांचा मार, तर कधी वर्गाबाहेर कोंबडा बनायचं किंवा बाकाच्या बाजूला आेंडवं उभं राहण्याची शिक्षा. शिक्षा भोगताना हळूच उभं राहून मागे बसलेल्या मुलीला पाहायचं किंवा मित्रांकडे पाहून खीखी करत हसायचं. शाळा सुटल्यानंतर घरी जाताना केलेली धमालमस्ती, टिंगलटवाळक्या अन् मग शाळा संपल्यानंतर शिक्षकांच्या पाया पडताना किंवा आपलं मनोगत सांगताना आणि मित्रांना मिठी मारत ढसाढसा रडायचं.

या शालेय जीवनातील आठवणी कुठेही छायाचित्रात पाहायला मिळणार नाहीत. त्या कुठेतरी मनाच्या कोपर्‍यात कायम वास्तव्य करीत असतात आणि जेव्हा केव्हा ही मित्रमंडळी भेटली की मग स्वतःवर आणि एकमेकांवर हसण्याची मज्जा काही औरच असते. बर्‍याच आठवणी या फोटो अल्बमच्या माध्यमातून आठवणरुपी साठवून ठेवतो आणि हा अल्बम कधी हाती लागला की मग त्या आठवणींमध्ये मश्गुल व्हायला होतं. एखादा फोटो खराब झालेला किंवा फाटलेला दिसला की मन लगेच दुःखी होतं. मात्र आजकालच्या आधुनिक काळात सर्वांकडे कॅमेरा असलेले मोबाईल आहेत. त्यामुळे या कॅमेर्‍याच्या माध्यमातून आपले सुखद क्षण टिपून ठेवता येतात. कधी वेडेवाकडे सेल्फी काढायचे तर कधी व्हिडिओ. या आठवणींची साठवणी मोबाईल मेमरीत किंवा सुरक्षित कॉम्प्युटर वा गुगल ड्राइव्हमध्ये सेव्ह करून ठेवायची.

महेश मांजरेकर

माझ्या आयुष्यात मी तीन व्यक्तींना गमावलंय. त्यांना मी नेहमीच मिस करतो. त्यात पहिली व्यक्ती म्हणजे माझे वडील ज्यांचं बोट धरून चालायला शिकलो. तर दुसरा व्यक्ती म्हणजे माझा कुत्रा मोंटू ज्याचे मी माझ्या मुलाप्रमाणे लाड केले आणि सांभाळले. तिसरा व्यक्ती म्हणजे माझ्या पूर्वीच्या घराशेजारी राहणारा 14 वर्षांचा छोटा मुलगा प्रेम. ज्याच्यामुळे मला प्रेम काय असतं, कसं असतं हे समजलं. या तिघांसोबत व्यतित केलेल्या सुखद आठवणी मी माझ्या उराशी बाळगून पुढील आयुष्याची वाटचाल करतो आहे.

 


महेश मांजरेकर

 

First Published on: July 5, 2018 5:17 PM
Exit mobile version