महान क्रांतिकारक, महायोगी 

महान क्रांतिकारक, महायोगी 

योगी अरविंद घोष

श्री ऑरोबिंदो ऊर्फ (श्री अरविंद) योगी अरविंद घोष हे विसाव्या शतकातील एक महान क्रांतिकारी व युगप्रवर्तक तत्वद्न्य आणि महायोगी होते. ते स्वातंत्र्य-सेनानी, शिक्षकतद्न्य आणि महाकवी या विविध भूमिकांनी ओळखले जातात. अरविंदांचा जन्म १५ ऑगस्ट १८७२ रोजी कोलकता येथे झाला होता.

त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णधन घोष आणि आईचे नाव स्वर्णलता होते. इंग्लंडमधील वास्तव्यात कृष्णधन यांच्या मनावर तेथील जीवन पद्धतीचा व विचार पद्धतीचा खूप परिणाम झाला. त्यांना इंग्लिश शिक्षण, त्यांच्या चालीरीती ही सर्व आदर्श वाटू लागली. मुलांवरही तेच संस्कार व्हावेत या हेतूने त्यांनी मुलांना बालपणीच शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवून दिले. भारतीय धर्म, संस्कृती व जीवन पद्धतीचा वाराही मुलांना लागू नये म्हणून त्यांनी मुलांना बंगाली ही त्यांची मातृभाषा देखील शिकू दिली नाही. लहानपणापासूनच त्याच्या विचारांवर इटालियन क्रांतिकारक जोसेफ माझिनी मॅझिनी आणि गॉरिबॉल्डी यांची छाप होती. वयाच्या सातव्या वर्षी अरविंद शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. लहान वयातच त्यांनी लॅटिन, इंग्लिश, ग्रीक या भाषांमध्ये नैपुण्य मिळविले. केम्ब्रिज शिकत असताना त्यांच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत झाली. ते ‘इंडियन मजलिस’ या संघटनेचे कार्यवाह बनले.

अल्पावधीतच ते एक जहाल देशभक्त म्हणून ओळखले जाऊ लागले. आपल्या मुलाने आय.सी.एस. ची परीक्षा उत्तीर्ण करावी ही वडिलांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. ते आय.सी.एस. ही परीक्षा पास झाले होते, पण अश्वारोहणात नापास झाले. फेब्रुवारी १८९३ मध्ये योगी अरविंद भारतात येऊन पोहोचले. भारतात परतल्यानंतर ते बडोदा संस्थांच्या नोकरीत रुजू झाले. बडोद्यास सयाजीराव गायकवाड यांचे सचिव म्हणून त्यांनी काम केले. महाविद्यालयात फ्रेंच व इंग्रजीचे प्राध्यापक आणि कॉलेजचे उपप्राचार्य म्हणूनही काम केले. येथे ते बंगाली आणि संस्कृत या भाषा शिकले. तिथे असतानाच त्यांनी वेदांचा अभ्यास केला व योगसाधनेस प्रारंभ केला. तेथे त्यांनी भारतीय तत्वज्ञानाचे वाचन केले. विष्णू भास्कर लेले या महाराष्ट्रीयन योग्याशी त्यांचा परिचय झाला आणि त्यांच्याकडून त्यांनी योगाचे प्राथमिक धडे गिरविले.

योगमार्गातील त्यांची प्रगती पाहून स्वतः लेलेदेखील स्तिमित झाले. याच काळात ते राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीकडे ओढले गेले. ते लोकमान्य टिळकांचे सहकारी बनले. राष्ट्रीय आंदोलनात ते सक्रिय सहभागी झाले. त्यांनी मुंबईच्या ‘इंदुप्रकाश वृत्तपत्र’ या वर्तमानपत्रात लेख लिहून आपली राजकीय मतेही मांडली. अल्पावधीतच ते हिंदुस्थानातील अग्रगण्य नेत्यांपैकी एक बनले. बंगालच्या १९०५ मध्ये झालेल्या फाळणीनंतर ते हिंदुस्थानातील पहिल्या नॅशनल कॉलेजचे प्राचार्य झाले. त्यांनी मांडलेल्या शिक्षणविषयक विचारांमुळे ते शिक्षणतज्‍ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्याच वर्षी त्यांनी मातरम हे वृत्तपत्र सुरू केले. बंगालमधील क्रांतिकारक चळवळीचे प्रवर्तक असताना, इंग्रज सरकारने त्यांना एका खटल्यात गोवले. त्यांना १९०७ मध्ये एका वर्षाची कैद झाली. त्यांना अलिपूर येथे कारावासात ठेवण्यात आले होते. तेथे त्यांनी योगसाधना केली. त्यांना तेथे सर्वत्र वासुदेवाचे दर्शन झाले, असे म्हणतात. हा त्यांचा अनुभव त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला.

दरम्यान, त्यांच्या बचावाचे काम देशबंधू चित्तरंजन दास यांनी केले. त्यांची यथावकाश निर्दोष सुटका झाली. झालेल्या या साक्षात्कारानंतर, भारताच्या स्वातंत्र्याविषयी ते निःशंक झाले. राजकारणातून निवृत्ती घेऊन, ते समग्र मानव जातीच्या परिवर्तनाच्या दिशेने स्वतःला कार्यप्रवृत्त करते झाले. ब्रिटिशांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते गुप्तपणे प्रथम चंद्रनगरला आणि नंतर १९१० मध्ये पॉंडिचेरी येथे गेले. ते १९५० पर्यंत म्हणजे अखेरपर्यंत ते तेथेच राहिले. पोंडिचेरी ही त्यांची कर्मभूमी, योगभूमी ठरली. मानवाची प्रगती आणि आध्यात्मिक उत्क्रांती याविषयी त्यांचे स्वतंत्र चिंतन नंतर प्रसिद्ध झाले. योगी अरविंद यांनी कर्म, ज्ञान आणि भक्ती यांच्या समन्वयावर आधारित ‘पूर्णयोगा’ची मांडणी त्यांनी केली. ‘माणूस हा उत्क्रांतीतील शेवटचा टप्पा नाही, त्यानंतर अतिमानसाचा उदय व्हायचा आहे’; यासंबधीची तार्किक आणि तात्त्विक मांडणी त्यांनी ‘दिव्य जीवन’ या ग्रंथातून केली आहे.

First Published on: August 14, 2020 1:03 PM
Exit mobile version